गोधन गो शाळेत तयार होते शेणा पासुन धुप व होळी करिता काड्या,पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार

अंबरनाथ(प्रतिनिधी) :  आपल्या गौधन गो शाळेतून पर्यावरण रक्षणासाठीअजय दसपुते यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी गाईच्या शेणापासून कोणत्याही केमिकलचा वापर न करता सुगंधी धूप आणि होळीसाठी काड्या तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. भविष्यात अंत्यसंस्कारासाठी देखील शेणाच्या काड्यांचा वापर करण्यासाठी  पुढाकार घेण्यात येणार असल्याचेही अजय दसपुते यांनी सांगितले. 

आपली बड्या रकमेची नोकरी सोडून अंबरनाथकर असलेले अजय दसपुते यांनी गीर गाईंची गो शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. लोकनगरी जवळील फार्मिंग सोसायटी मध्ये त्यांनी भाडे तत्वावर जागा घेतली आणि सुरुवातीला चार गायी घेऊन दग्ध व्यवसाय सुरु केला  आणि आज त्यांच्याकडे साधारण वीस ते पंचवीस  देशी गाई  आहेत. आपल्या उपजीविकेसाठी दूध व्यवसाय तर आहेच मात्र सामाजिक बांधिलकी म्हणुन  आपल्या गोशाळेत सुगंधी धूप, होळीसाठी काड्या तसेच भविष्यात अंत्यसंस्कारासाठी देखील लाकडांचा वापर न करता शेणापासून तयार केलेल्या काड्यांचा वापर करण्यासाठी अजय दसपुते प्रयत्न करत आहेत. 

गौधन गो शाळेत येत्या काही दिवसात देशी कोंबडी, शेळी असेही प्राणी आणून या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय अभ्यास सहलीची सोय करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना गाय, कोंबडी, शेळी व इतर पाळीव प्राण्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न असणार असल्याचे अजय  दसपुते यांनी सांगितले आहे.सध्या अनेक सुशिक्षीत तरुणांनी देशी उद्योगाकडे  वळून आत्मनिर्भरतेच्या मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. अंबरनाथ येथील अजय दसपुते त्यापैकी एक आहेत. जर्मनीमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांनी येथील शेतकी सोसायटीत भाड्याने जागा घेऊन राम कुडतरकर यांच्यासोबत भागिदारीत देशी गायींचे संगोपन सुरू केले आहे. सध्या या गोशाळेत विविध जातीच्या २५ देशी गायी आहेत. 

श्रीकृष्णाच्या गोकुळातील वास्तव्यातील गोवर्धन पर्वताची गोष्ट सर्वानाच माहिती आहे. प्रत्यक्षात ते ’गोबरधन आहे. गाईचे दूध, दुधापासून बनणारे पदार्थ हे अमूल्य आहेच, याशिवाय शेण, गोमूत्र हे सुद्धा बहुमूल्य आहे. मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी ते अतिशय उपयुक्त आहे. देशी ‘गोधना’चे हे महत्त्व ओळखून अजय दसपुते आणि त्यांच्या मित्राने गायींचे संगोपन सुरू केले आहे.

सध्या अंबरनाथ पूर्व विभागात शेतकी सोसायटीतील त्यांच्या गोशाळेत या गायी आहेत. दीड वर्षांपूर्वी गोठा भाड्याने घेऊन अजय दसपुते यांनी हा व्यवसाय सुरू केला. सध्या या गोशाळेतून अंबरनाथ, उल्हासनगर, आणि बदलापूर परिसरातील ग्राहकांना ‘अ-२’दर्जाच्या दूधाचे वितरण होते. कपिला, डांगी, खिल्लारी, गौळव या देशी जातीच्या या गायी आहेत. दुधाव्यतिरिक्त दही आणि तूपाचीही उपलब्धतेनुसार विक्री होते.  अतिशय सुरक्षितरित्या दूध घरोघरी पोहोचविले जाते. त्यासाठी एक सेवक नेमला आहे.

दुध आणि दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त शेणखत, शेणाच्या लाद्याा (शेणी), गोमूत्र हे आरोग्य आणि पर्यावरणासाठी उपयुक्त घटकही या गोशाळेत तयार होतात. ‘अग्निहोत्र’करण्यासाठी सुकलेल्या शेणाच्या वड्या उपयुक्त ठरतात. ते सकाळ-संध्याकाळ जाळल्याने परिसरातील वातावरण शुद्ध होते. गायीच्या शेणात ३५ टक्के ऑक्सिजन असते. ते वाळवून त्याच्या शेणी केल्यावर त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढून ४५ टक्के इतके होते. त्या शेणी जाळल्यावर तयार होणाऱ्या धुरावाटे ५५ ते ८० टक्के ऑक्सिजन हवेत सोडला जातो, अशी माहिती अजय दसपुते यांनी दिली. या गोशाळेत घरात जाळण्यासाठी विविध आकाराच्या शेणकांडी, शेणाच्या वड्या तसेच नैसर्गिक कीटकनाशक जीवामृतही बनविले जाते. शेणखतही गरज आणि उपलब्धते नुसार लोकांना दिले जाते. तबेल्यातच मक्याची लागवड करून गायींसाठी हिरवा ताजा चारा मिळविला जातो. याशिवाय सकाळ-संध्याकाळ गायींना सकस आहार दिला जातो.

सकस आणि पर्यावरण स्नेही उत्पादने 

केवळ पैसे कमविणे हेच ध्येय असते, तर जर्मनीतील नोकरी सोडून हा उद्योग पत्करला नसता. देशी गोशाळा सुरू करण्यामागे लोकांना सकस आणि पर्यावरण स्नेही उत्पादने उपलब्ध करून द्यावीत, हा उद्देश होता. त्यात मी नक्कीच यशस्वी ठरतोय. या चांगल्या कामाला मदत करण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. त्यांचा मी आभारी असल्याचे गोशाळेचे चालक अजय देसपुते म्हणाले.

संबंधित पोस्ट