त्या'हल्लेखोरांवर कारवाई झालीच पाहिजे,भाजपा नेते किरीट सोमय्या यांची मागणी .

बदलापूर(प्रतिनिधी) : बदलापूरजवळील ढोके-दापीवली येथे भाजपा पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यासह चौघांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सर्व हल्लेखोरांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली.

किरीट सोमय्या यांनी बदलापुरातील भगवती रुग्णालयाला भेट देऊन हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पदाधिकाऱ्यांची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष राम पातकर, राजेंद्र घोरपडे, संजय भोईर आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बुधवारी संध्याकाळी ५.३० वा च्या सुमारास ढोके-दापीवली येथील नदी जवळ भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष हेमंत भोईर, ग्रामपंचायत सदस्य श्रीधर भोपी आणि  इतर दोघे जण शिर्डीहून घरी परतत असताना त्यांच्यावर दहा ते पंधरा जणांनी धारदार शस्त्राने आणि लोखंडी रॉडने हल्ला केला.या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर  रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे कालच भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनीही या रुग्णालयात भेट देऊन हल्ल्यात जखमी झालेल्यांची विचारपूस केली होती.

संबंधित पोस्ट