
बारवी डॅम परिसरातील बारा गावे 'नॉट रिचेबल'बीएसएनएलच्या सातत्याने खंडित होणाऱ्या सेवेवर स्थानिक नागरिक संतप्त .
- by Rameshwar Gawai
- Nov 04, 2020
- 1038 views
बदलापूर(प्रतिनिधी) :बदलापूर शहरापासून अवघ्या दहा-बारा किमी अंतरावरील बारवी डॅम परिसरातील गावे व आदिवासी पाडे सुमारे महिन्याभरापासून नॉट रिचेबल आहेत. या भागात बीएसएनएल वगळता अन्य कोणतेही खाजगी मोबाईल नेटवर्क नाही. त्यात बीएसएनएलची सेवा सातत्याने खंडित होत असल्याने या भागातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील बारवी डॅम परिसरात जवळपास १० ते १२ गावे तसेच आदिवासी पाडे आहेत. जवळ पास बारा हजार ते पंधरा हजार लोकसंख्या ह्या संपूर्ण परिसरात वास्तव्यास आहे. हा भाग भौगोलिक दृष्ट्या उंच सखल , मध्यम उंचीचा डोंगराळ आहे. बारवी धरण हे ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरे आणि औद्योगिक क्षेत्रांना पाणी पुरवठा करणारे अतिशय महत्वाचे धरण आहे. धरण व परिसर हिरवाईने बहरलेला असल्याने तसेच रेल्वे स्टेशनपासून जवळ असल्याने पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. ह्याच विभागातून मुरबाड व बदलापूर शहरांना जोडणारा रस्ता जातो. अंबरनाथ बदलापूर, पनवेल, मुंबई, नवी मुंबई, जुन्नर,अहमदनगर कडे येणारी जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. थोडक्यात परिसराचे महत्व अनन्य साधारण आहे. मात्र असे असूनही ह्या परिसरात बीएसएनएल शिवाय कोणतेही खासगी मोबाईल नेटवर्क नाही. त्यातही बीएसएनएल मोबाईल सेवा सातत्याने खंडित होत असते. महिनाभरात केवळ १० ते १५ दिवसच मोबाईल सेवा सुरू असते. बारवी डॅम जवळच्या असलेल्या या भागात पावसाळ्यात पुरसदृश्य स्थिती नेहमी उदभवते , वर्दळीचा रस्ता असल्याने छोटे मोठे अपघात नेहमी होत असतात .आपत्कालीन परिस्थितीत बदलापूर मुरबाडला जाऊन मोबाईलचा वापर करावा लागतो. अशा वेळेस सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते.
'बीएसएनएलची सेवा सुधारा, नाहीतर बंद तरी करा'
कोणत्याही खासगी मोबाईल कंपन्या व्यावसायिक कारणास्तव ह्या परिसरात सेवा पुरविण्यास इच्छुक नाहीत , बीएसएनएल सेवा नियमितपणे देत नाही त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून सेवा नियमितपणे देण्यास बीएसएनएलअसमर्थ असल्यास त्यांची या विभागातील सेवा कायमची पूर्णत: बंद करावी,अशा शब्दांत या भागातील नागरिक आपला संताप व्यक्त करीत आहेत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम