वसई-विरार:५६३ इमारती धोकादायक,दुर्घटना घडण्याआधी दक्षता घ्या

विरार(दीपक शिरवडकर) - कोपरी येथील नित्यानंद धाम इमारतीचा काही भाग दि.१६/१०/२०१९ रोजी कोसळून भूमि पाटील नावाच्या मुलीचा जीव गेला होता. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज येथे जुलैमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला होता.ऑगस्टमध्ये काजूपाडा येथील महावीर चाळ खचली.आता सप्टेंबर २०२० ला नालासोपाऱ्यातच साफल्य इमारत कोसळली.त्यामुळे वसई-विरारमधील अंदाजे १८० इमारती कधीही कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

वसई-विरार उपप्रदेशात जुजबी दर्जाहीन बांधकाम करीत, मोठ्या प्रमाणात इमारती उभारल्या आहेत. स्ट्रक्चर ऑडिट, फायर ऑडिटचा तर याठिकाणी थांगपत्ताच नाही. काही ठिकाणी बोगसरित्या नोंद असलेल्या हौसिंग सोसायटया स्थानिक स्वराज्य संस्थेची पूर्वपरवानगी न घेताच मनमानी तऱ्हेने सडक छाप व्यक्तींकडून दुरुस्ती कामे करून इमारतींना धोका निर्माण करताना दिसतात. जमिनमालकही याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे भविष्यात एखादी इमारत दुर्घटनाग्रस्त झाल्यास दोष कोणाला द्यायचा?अशी चिंता सर्वसामान्यांना भेडसावत आहे.

वसई-विरार पालिकेने आतापर्यंत ५६३ इमारतींची धोकादायक म्हणून नोंद केली असून नोटीसाही बजावल्या आहेत. रहिवाशांना घरे खाली करण्यास सांगितले आहे. कोरोना-पाऊस आणि गेलेले रोजगार या गर्तेतील रहिवाशी अशा धोकादायक इमारतीमध्ये जीव मुठीत धरून रहात आहेत. त्यातच उपनिबंधक-सहकारी संस्था-वसई विभागाने सक्षमपणे तपासणी न करता खोटया कागदपत्राने हौसिंग सोसायटया नोंद केलेल्या असल्याने अशा इमारतींमधील रहिवाशांसमोर मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरवर्षी पालिका धोकादायक इमारतींची यादी तयार करून नोटिसा बजावण्याचे सोपस्कार करण्यापलिकडे काहिही करत नाही. तर दुसरीकडे संक्रमण शिबिराचाही वाणवा आहे. धोकादायक इमारतीचा पुर्णविकास तातडीने करण्याकरता,तसेच अनधिकृत असणाऱ्या इमारती ठराविक दंडात्मक रक्कम आकारून अधिकृत करून वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांच्या नावे भुमि अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेन्स) करून देण्याकरता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यानी लक्ष घालून दिलासा द्यावा अशी मागणी रहिवाशी करत आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट