...त्यात पवारांचे काय चुकले?

भारतीय संविधानाने प्रत्येक धर्माच्या लोकांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे .पण त्याचा कुठे, कसा आणि किती उपयोग करावा यालाही काही मर्यादा घातलेल्या आहेत .पण जेंव्हा या मर्यादा ओलांडल्या जात आहेत असे दिसू लागते तेंव्हा त्याच्या विरोधात बोलण्याचा किंवा आवाज उठवण्याच प्रत्येकाला अधिकार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तेच केले. शरद पवार आज ८० वर्षांचे आहेत आणि या वयातही ते कोरोना विरुद्धच्या लढाईत हिरीरीने भाग घेत आहेत. सत्ता काळातील आपल्या प्रशासकीय अनुभवाचा वापर करून सरकारला या लढाईत मार्गदर्शन करीत आहेत आणि कोरोनाचं हे संकट देशावरील मोठी आपत्ती असल्याने बाकीचे सगळे मुद्दे सोडून राजकीय पक्षांनी एकत्रितपणे कोरोना विरुद्धच्या लढाईत भाग घ्यावा एवढीच त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. अशावेळी केंद्र सरकार किंवा पंतप्रधान पदासारख्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने कशाला अधिक महत्त्व द्यायला हवे याबाबत जनतेने किंवा विरोधी पक्षाने अपेक्षा बाळगणे चुकीचे कसे ठरू शकते? त्यामुळे राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का असा  पवारांनी जो प्रश्न केलाय त्यात काय चूक आहे? यात पवारांना प्रभू रामचंद्रांचा अपमान करायचा नव्हता किंवा हिंदूंच्या भावना दुखवायच्या नव्हत्या तर आज फक्त आणि फक्त कोरोना विरूद्ध सुरू असलेली लढाई लवकरात लवकर कशी जिंकता येईल आणि लोकांचा जीव कसा वाचवता येईल यालाच सरकारने प्राथमिकता द्यावी हे पवारांना सुचवायचे होते पण त्यांच्या बोलण्याचा भाजपवाले चुकीचा अर्थ लावून पवार हे हिंदूंच्या विरूद्ध आहेत असे भासवण्याचा प्रयत्न करीत आहेत पण आता ताबडतोब राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? हा प्रश्न एकटे पवारच नव्हे तर या देशातले लाखो लोकं विचारत आहेत त्यात राम भक्त हिंदूही आहेत मग त्या सगळ्यांना फासावर लटकवाल का? अयोध्येत राम मंदिर बांधण्याची सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे त्यामुळे राम मंदिर होणारच आणि व्हायलाच हवे यात वाद नाही पण कोरोनाच्या या भयंकर संकटाच्या काळात राम मंदिर बांधण्यासाठी इतका उतावळेपणा कशासाठी? कोरोनाचे हे संकट संपल्यावर सावकाश राम मंदिर बांधता आले असते आणि त्यावेळी भूमी पूजनाच्या सोहळ्यात देशभरातील लोकांनाही सहभागी होता आले असते त्यामुळे राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा अधिक भव्य दिव्य झाला असता पण आता कोरोनाचे भयंकर संकट सुरू असताना ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते घाई गडबडीत जो भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्याला जास्तीत जास्त लोकांना उपस्थित राहता येईल का? कारण ट्रेन बसेस बंद आहेत त्यातच सोशल डिस्टन्सची सक्ती असल्याने भूमी पूजनाला गर्दी करता येणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानांचा एक एक क्षण यावेळी महत्वाचा आहे कारण एकीकडे कोरोनाच्या संकटा मुळे त्यांना दिवसभर देशातील सर्व राज्यांच्या सरकारांच्या संपर्कात राहावे लागतेय. प्रत्येक राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवायला लागतेय तर दुसरीकडे पूर्वोत्तर सीमेवर युद्ध जन्य परिस्थिती आहे. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे त्यावरही लक्ष ठेवावे लागत आहे अशावेळी देशात धार्मिक सोहळ्यांमध्ये पंतप्रधानांना अडकवून ठेवणे कितपत योग्य आहे याचा विचार हिंदुत्व वाद्यांनी करायला हवा. राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? या पवारांच्या वाक्याचा  शब्दश अर्थ लावून धार्मिक तणाव वाढवून आपले राजकारण साधण्याचा कुणी प्रयत्न करू नये कारण कोरोना ही आपत्ती देवा धर्माच्या पलीकडची आहे त्यामुळे पूजा अर्चा करून ,यज्ञ, महायज्ञ करून किंवा पवार म्हणतात त्याप्रमाणे राम मंदिर बांधून सुद्धा कोरोना जाणार नाही कारण हा विषय वैद्यकीय शास्त्राच्या अखत्यारीतील आहे त्यामुळे वैद्यकीय उपचारानेच तो बरा होईल. धार्मिक आस्था बाळगून देवा धर्माला साकडे घालून तो बरा होणार नाही नाहीतर आपल्याकडे ३३ कोटी देव आहेत त्यातल्या एकाला तरी कोरोनाला रोखता आले काय ? आणि हीच वस्तुस्थिती आजच्या शिकल्या सवरलेल्या लोकांनी लक्षात घ्यायला हवी. राम प्रत्येकाच्या हृदयात आहे त्यामुळे राम मंदिराचा विषय पुन्हा रस्त्यावर आणून एकमेकांची डोकी फोडण्यात ज्या लोकांना स्वारस्य आहेत अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी कारण आता बस झाले! लोक धर्माच्या राजकारणाला वैतागले आहेत त्यांना या कोरोनाच्या संकटातून कसे बाहेर काढता येईल याचाच विचार करा. देव, धर्म, आस्था थोडे दिवस बाजूला ठेऊन सर्वांनी ऐकत्र येवुन कोरोनाच्या या भयंकर संकटावर मात करूया. एक गोष्ट मात्र खरी की धर्म कधी कधी माणसाला धर्मसंकटात टाकतो .आज शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समोरही राम मंदिर भूमी पूजनाच्या निमित्ताने असेच धर्मसंकट उभे राहिले आहे कारण उद्धव ठाकरे ज्या महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादीला वाटतेय की उध्दव ठाकरे यांनी भूमिपूजनाला जावू नये पण शिवसेना पक्षाचे मूळ धोरण मात्र हिंदुत्व वादी असल्याने आणि राम मंदिरासाठी झालेल्या लढ्यात शिवसेनेचे मोठे योगदान असल्याने उध्दव ठाकरे यांनी भूमिपूजनास जायलाच हवे असा शिवसेना नेत्यांचा आग्रह आहे त्यामुळे सरकार आणि पक्ष या दोघांच्या मध्ये उद्धव ठाकरेंची गाडी अडकली आहे त्यामुळे ते आता काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट