साठी बुद्धी नाठी

माणसाचे जसे जसे वय वाढते तशी त्याची अक्कल कमी होत जाते म्हणूनच साठी बुद्धी नाठी असे म्हटले जाते. पण साठी ओलांडलेल्या अशा नाठाळांच्या  माथी वेळीच काठी मारली नाही तर हे साठी ओलांडलेले  नाठाळ समाजात यादवी घडवून आणतील. असाच एक साठी ओलांडलेला नाठाळ सध्या महाराष्ट्रासाठी डोकेदुखी ठरतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करताना जगाला युद्ध नको तर बुद्ध हवाय आणि जगाला बुद्ध भारताने दिलाय असे विधान केले होते.  पंतप्रधानांचे हे विधान निश्चितपणे वास्तववादी आणि जगासाठी मार्गदर्शक आहे. पण त्यावर टीका करताना संभाजी भिडे नावाच्या एका माणसाने पंतप्रधान खोटे बोलत आहेत असा आरोप केला आहे. या भिडेच्या मते बुद्धाच्या विचारांचा जगाला काहीच उपयोग नाही तर शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या विचारांची जगाला गरज आहे. शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांनी अन्याया विरुद्ध तलवार उचली होती. आणि घुसखोर मुस्लिम राज्यकर्त्यांकडून माता भगिनी, गोरगरीब यांच्यावर जे अन्याय केले जात होते. त्या अन्याया विरुद्ध लढा दिला आणि रयतेच्या राज्याची म्हणजेच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तर संभाजीनेही स्वराज्य वाचवण्यासाठी आयुष्यभर मोघलांशी लढा दिला. त्यामुळे त्या दोघांविषयी सुद्धा देशातील जनतेला आदर आहे. पण त्यांच्या विचारांची आणि कार्याची तुलना बुद्धाशी करणे योग्य नाही. भगवान बुद्ध हे सुद्धा राजघरण्यातले होते पण जगातल्या कुठल्याही समस्यांवर युद्ध आणि त्यातून होणारी हिंसा हा तोडगा नाही. हे जेंव्हा त्यांना समजले तेंव्हा त्यांनी सर्व सुखाचा आणि संसाराचा त्याग केला. बोधी वृक्षाखाली बसून त्यांनी जी ध्यान साधना केली त्यातून त्यांना जगाच्या सुखशांतीचा मार्ग सापडला आणि तो मार्ग म्हणजेच शांती, सदाचार, अहिंसा आणि बंधुभाव! पुढे भगवान बुद्धांनी आपल्या लाखो अनुयायांच्या माध्यमातून जगभर शांती आणि अहिंसेचा प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळेच आज जगात शांतता नांदत आहे. पण संभाजी भिडे सारख्या जातीयवादी लोकांना बुद्धाच तत्वज्ञान कसे पटणार?  कारण त्यांची हयातच समाजात भेदभाव निर्माण करण्यात गेली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसह जगातल्या ज्या ज्या लोकांनी बुद्धाचे तत्वज्ञान समजून घेतले आणि जगाच्या कल्याणासाठी प्रयत्न केले. त्या त्या महापुरुषांना जग वंदन करतंय. त्याच्या कर्तृत्वाचे गुणगान  केले जातेय. अशा वेळी संभाजी भिडे सारखा एखादा माणूस जेंव्हा बुद्धाचे तत्वज्ञान नाकारण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. आणि त्याच बरोबर या संभाजी भिडेला सांगावेसे वाटते की बुद्ध समजायला बुद्धी असावी लागते. या माणसाने आजवर अनेक वेळा अकलेचे तारे तोडलेत. एकदा तर त्याने आंबे खाल्ल्यावर मुलगाच होतो असा जावई शोध लावला होता. त्याच्याही पूर्वी  त्यांनी अशीच वादग्रस्त विधाने केली होती. वाईट फक्त एकच गोष्टीचे वाटते ते म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रासारख्या साधू संतांच्या आणि विचारवंतांच्या भूमीत संभाजी  भिडे सारखे नाठाळ लोक समाजात विष पेरण्याचे काम करीत आहेत. आणि सरकार अशा लोकांकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत आहे. भीमा कोरेगावच्या दंगली मागेही या संभाचा हात होता असा संशय अनेकांनी व्यक्त केला. पण मुख्यमंत्री फडणवीस या संभाच्या पाठीशी राहिले आणि आरोपीच्या पिंजऱ्यात कोणाला उभे केले तर जे विद्वान होते, समाजसुधारक होते ज्यांनी जातीवादा विरुद्ध आवाज उठवला अशाना तुरुंगात डांबले. म्हणून तर थेट पंतप्रधानांच्या विधानावर टीका करायची या संभाची हिम्मत झाली. मात्र असे लोक चलाख असतात आपला स्वार्थ साधण्यासाठी ते एखाद्या मोठ्या माणसाच्या नावाचा आधार घेतात संभानेही तेच केलं. बुद्धांवर टीका करताना शिवाजी महाराज आणि संभाजी राजेंच्या नावाचा आसरा घेतला. जेणेकरून  टीका करताना कोणी काही आवाज उठवला तर आपण शिवाजी व संभाजी बद्दल बोलल्यामुळेच आपल्याला त्रास दिला जातोय असा कांगावा करून मराठा समाजाला भडकवायला मोकळे झालो. संभाचा हा गनिमी कावा सरकारने ध्यानात घ्यायला हवा. ऐन निवडणुकीच्या काळात संभाजी सारख्या जातीयवादी लोकांना पुढे करून सरकारला जर मराठा समाजाचे मते मिळतील असे वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे.  कारण आजचा मराठा समाज सुशिक्षित आहे.  त्याला सामाजिक जबाबदारीचे भान आहे आणि मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांच्या शिकवणीवर चालणाऱ्या मराठा समाजाने बुद्धाचे शांतीचे तत्त्वज्ञानही कधी नाकारले नाही किंवा बुद्धाला कधी विरोध केला नाही. त्यामुळे संभाजी जरी काही बरळला तरी मराठा समाज त्याच्या मागे फरफटत जाणार नाही.

रिपोर्टर

  • Editor
    Editor

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट