शिवशाहीतील औरंगजेब

महाराष्ट्र परिवहन महामंडळ हे महाराष्ट्रातील एक बदनाम महामंडळ आहे त्यामुळेच राज्यातील खेड्यापाड्यातील जनतेला एसटीची चांगली सेवा सुविधा मिळत नाही. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसाठी एसी केबिन आहेत पण ग्रामीण भागातील एसटी डेपोंमध्ये साधी शौचालयाची सुद्धा चांगली व्यवस्था नसल्याने एसटी बसेस मध्ये काम करणाऱ्या महिला वाहकांना नैसर्गिक विधीसाठी डेपोच्या मागे असलेल्या शेतात किंवा अन्य आडोशाला जावे लागते आणि हे हरामखोर मात्र वेग वेगळ्या प्रकारचे घोटाळे करून आपल्या तिजोऱ्या भरत आहेत. काँग्रेसच्या राज्यात या सगळ्या गोष्टींकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत होते पण आता राज्यात उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवशाहीचे सरकार आले आहे. निदान उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे तरी सुधारणा होईल असे वाटत होते पण कसले काय ? गेंड्याच्या कातडीचे असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना सत्तेवर कुणीही असो त्यांची दुकाने व्यवस्थित चालू असतात आणि जनता जेंव्हा संकटात असते तो संकटाचा काळ तर सरकारी अधिकाऱ्यांसाठी कमाईचा काळं असतो आणि हे सगळ एवढ्या साठी सांगायचे आहे की कोरोनामुळे पंढरपूरच्या वाऱ्या रद्द झाल्यामुळे संतांच्या पादुका एसटी बसेसने पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र  एसटी महामंडळाने या पादुकांनाही प्रवासभाडे आकारले. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथांच्या पादुका काही मोजक्याच वारकऱ्यांसोबत पंढरपूरला शिवशाही बसने पंढरपुरकडे रवाना करण्यात आल्या मात्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या प्रवासाचे तब्बल ७१ हजार भाडे आकारण्यात आले. बिचाऱ्या वारकऱ्यांनी वर्गणी काढून हे ७१ हजार एसटी महामंडळाला दिले इतरही संतांच्या पादुका एसटी मधूनच पंढरपूरला नेण्यात आल्या त्यांच्याकडून सुद्धा भाडे घेतले असणार पण हे का? एस टी महामंडळाला एवढी भीक लागलीय का? लॉक डाऊन मध्ये एसटी महामंडळाला थोडा आर्थिक तोटा झाला हे खरे आहे पण त्यासाठी संतांच्या पादुकांचे अव्वाच्या सव्वा भाडे घेणे कितपत योग्य आहे? पंढरपूरचा विठूराया हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात भरणारी यात्रा हा एक मोठा आनंद सोहळा असतो आणि या सोहळ्यात काय टाटा, बिर्ला, अंबानी सारखे करोडपती सामील होत नाहीत तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला गरीब शेतकरी सामील झालेला असतो. त्याची विठ्ठलावर इतकी श्रद्धा आहे की तो दोन तीनशे किमी पायी चालत पंढरपूरला जात असतो पण यावर्षी कोरोनाने सगळ्यांच्याच पायात बेड्या घातल्या त्यामुळे वाऱ्या पालख्या दिंड्या रद्द कराव्या लागल्या. वारकरी बांधवांसाठी हे खूप वेदनादायी होते तरीही त्याने सरकारच्या आदेशाचे पालन करून संतांच्या पादुका मोजक्याच वारकऱ्यांसोबत पंढरपूरला नेण्याची तयारी दर्शवली त्यामुळे या वारकरी बांधवांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची जबाबदारी सरकारची आणि राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाची होती पण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी इथेही हात मारण्याची संधी सोडली नाही आणि चक्क संतांच्या पादुकांचे प्रवासभाडे वसूल केले. आता परिवहन मंत्री म्हणे चौकशी करणार आहेत. परिवहन मंत्र्यांना याची माहिती नसावी यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही कारण भाड्या संबंधीचे मोठे निर्णय परिवहन मंत्र्यांच्या संमतीनेच होत असतात आणि परिवहन मंत्री अनिल परब हे शिवसेनेचे नेते आहेत पण आता बहुदा त्यांना देव, धर्म आणि हिंदुत्वाचा विसर पडला असावा. बरोबर आहे कारण सत्ता जिथे नीतिमत्ता विसरायला लावते तिथे देवा धर्माचे काय? राज्यात भलेही तीन पक्षांचे सरकार असले तरी मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि ठाकरे कुटुंबातला असल्याने राज्यात शिवशाहीचीच सत्ता आहे असे महाराष्ट्रातील जनतेला वाटतेय पण सरकार जरी शिवशाहीचे असले तरी प्रशासनात मात्र औरंगजेब बसलेले आहेत त्यामुळे ते कोणाकडूनही पैसे वसूल करू शकतात. एसटी महामंडळा मधल्या औरंगजेबाचे एक एक किस्से राजकारणातल्या घोटाळेबाजांना सुद्धा मागे टाकणारे आहेत. एसटीच्या नव्या बसेस नादुरुस्त दाखवून भंगार मध्ये विकण्यापासून ते सेकंड हँड गाड्यांची रंगरंगोटी करून नव्या बसेस विकत घेतल्याचे बतावणी करणाऱ्या एसटी महामंडळाच्या अनेक भानगडी यापूर्वीही चव्हाट्यावर आल्या आहेत आणि या आर्थिक घोटाळ्यांमुळेच एसटी महामंडळ सतत तोट्यात आहे. गाव तिथे एसटी आणि एसटी तिथे घोटाळा हे समीकरण आता संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक झाले आहे मात्र संतांच्या पादुकांचे प्रवास भाडे वसूल करणे हा प्रकारच संतापजनक आहे मात्र महामंडळात बसलेले हे अधिकारी इतके कोडगे आहेत  की उद्या साक्षात पांडुरंगाने जरी एसटीने प्रवास केला असता तरी त्यांच्याकडूनही या लोकांनी प्रवास भाडे वसूल केले असते तेंव्हा आज आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाला एवढेच सांगणे आहे की यापुढे तरी या कोडग्यांना सुबुद्धी दे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेला एसटी ची चांगली सेवा सुविधा मिळू दे! 

तसे पाहता मुंबईकर जनतेसाठी रेल्वेची लोकल सेवा ही लाईफ लाईन आहे अगदी त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील जनतेसाठी एसटी बसेस ची सेवा ही त्यांची जीवनवाहिनी आहे कारण खेडेगावांना शहरांशी जोडण्याचे काम एसटी करते आणि ग्रामीण भागातील लोक रोजच कोणत्या ना कोणत्या कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जात असतात शिवाय  गावांमध्ये उच्च शिक्षणाची सोय नसल्याने मुलांना शहरातील शाळा कॉलेजात जावे लागते थोडक्यात ग्रामीण जनतेचे  जीवन काही प्रमाणात का होईना शहरांवर अवलंबून असते आणि शहरात जाण्यासाठी एसटी बसेस हेच प्रामुख्याने प्रवासाचे साधन असते त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला एसटीची चांगली सेवा मिळणे गरजेचे असते पण ग्रामीण भागातील एसटी बसेसची अवस्था इतकी वाईट असते की प्रवासात प्रवाशांची हाडे खिळखिळी होतात त्यामुळे आजकाल ग्रामीण भागातले लोकही रिक्षा, खाजगी ट्रॅक्स, खाजगी बसेस यांचा पर्याय शोधतात त्यामुळे एसटीचे प्रवासी वर्ग हळू हळू कमी होऊन लालपरी दिवसेंदिवस तोट्यात जातेय मात्र हा तोटा कसा भरून काढायचा याचा विचार करायचे सोडून एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी स्वतःचेच खिसे भरायला सुरुवात केली आहे आणि आता तर संतांच्या पादुकांचे प्रवास भाडे वसूल केल्यामुळे  ग्रामीण भागातल्या जनतेच्या धार्मिक भावनाही दुखावल्या असून याची फार मोठी किंमत राज्य परिवहन महामंडळाला चुकवावी लागणार आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट