
स्कुल बस व्यवसायाला कोरोनाचा फटका .
बसमालक आर्थिक संकटात, ड्रायव्हर- अटेंडंट झाले बेरोजगार .
- by Adarsh Maharashtra
- May 21, 2020
- 1331 views
बदलापूर : रिक्षा व्यवसायाप्रमाणे स्कुल बस व्यवसायालाही कोरोनाचा जोरदार फटका बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून या स्कुल बस धूळ खात उभ्या आहेत. त्यामुळे बससाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरायचे कसे? कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न बसमालकांसमोर आहे. बसवर काम करणारे ड्रायव्हर व महिला अटेंडंट बेरोजगार झाले असल्याने त्यांनाही कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे असा प्रश्न पडला आहे.
बदलापुरात सुमारे २०० स्कुल बस विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करण्याचे काम करीत आहेत. कोरोनाच्या पार्शवभूमीवर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून स्कुल बस बंद आहेत. तेव्हापासून आतापर्यंत या स्कुल बस धूळ खात उभ्या आहेत. बहुतांश बस मालकांनी बँकांकडून कर्ज काढून या बस खरेदी केल्या आहेत. तेव्हापासून या बस जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे या बसवर काम करणारे ड्रायव्हर व महिला अटेंडंट बेरोजगार झाले आहेत. दुसरीकडे उत्पन्नच नसताना बससाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरायचे कसे? ड्रायव्हर, अटेंडंटना पगार द्यायचा कसा? आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा तरी कसा? असा प्रश्न बसमालकांना पडला आहे. लॉकडाऊन कधी संपणार हे अद्याप स्पष्ट नाही. आणि संपल्यानंतरही शाळा सर्वात शेवटी सुरु होतील. शाळा सुरु झाल्यावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्कुल बससाठी सोशल डिस्टंसिंग संदर्भात नवीन नियमावली येणे अपेक्षित आहे.त्यामुळे एका बसमध्ये सध्याच्या तुलनेत निम्म्याहून कमी विद्यार्थ्यांची वाहतूक करावी लागणार असल्याने त्यासाठी आताच्या दुप्पट तिप्पट शुल्क आकारले तरच बस मालकांना ते परवडणार आहे. त्यामुळे शासनाने स्कुल बस मालक, चालक व कर्मचाऱ्यांचाही विचार करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्कुलबस मालकांकडून होत आहे.
दरवर्षी एप्रिल मे महिन्यात शाळांना सुट्टी असल्याने या काळात स्कुल बस पासिंग करून घेत असतात. परंतु यंदा लॉकडाऊनमुळे ते शक्य झालेले नाही. आणि आता ही प्रक्रिया सुरु होईल त्यावेळी बस मालकांकडे यासाठी पैसे नसतील. चाळीस बसच्या स्कुल बसच्या इन्शुरन्ससाठी सुमारे ५२ ते ५३ हजार रुपये खर्च होतो. सध्याच्या परिस्थितीत आवक पूर्णपणे ठप्प असल्याने परिस्थितीत बस मालकांना हे ही शक्य होणार नसल्याचे स्कुल बस मालकांचे म्हणणे आहे. या परिस्थतीचा विचार करून शासनाने स्कुल बस चालकांना आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच त्यांना बस पासिंग व इंश्युरन्स माफ करावे किंवा त्यामध्ये सवलत द्यावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री व ठाणे जिल्हयाच्या पालकमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान , राष्ट्रवादीच्या वतीने मंगळवारी (ता. १९) स्कुल बस मालक, चालक व अटेंडंट याना धान्य वाटप करून मदतीचा हात देण्यात आला. यावेळी कालिदास देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, लक्ष्मण फुलवरे, सुशील देशमुख, गणेश थेटे, अनिसा खान, ज्योती वैद्य, स्कुल बस असोसिशनचे भट, रुपेश चंबावने आदी उपस्थित होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम