उभारू निश्चायची गुढी

आज गुढी पाढवा हिंदू संस्कृतीत हा साडे तीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो त्यामुळे आजच्या दिवशी नवी खरेदी नावे संकल्प केले जातात आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली अशी एक आख्यायिका आहे. तर आजच्या दिवशीच प्रभू रामचंद्राने १४ वर्षाचा वनवास भोगून अयोध्येत प्रवेश केला. त्याच्या स्वागतासाठी लोकांनी घरावर गुढ्या तोरणे उभारली कारण गुढी ही विजयाचे प्रतीक आहे आणि प्रभू रामचंद्रांनी बलाढ्य रावणाचा पराभव करून एक मोठा विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला होता म्हणून आजच्या दिवशी लोक गुढ्या उभारून नव वर्षाचे स्वागत आणि संकल्प करतात. एरव्ही दरवर्षी गुढी पाडव्याचा एक वेगळाच उत्साह असतो. सराफा बाजारात सोने खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी उसळलेली असते. रस्त्यांवर चौकाचौकात रांगोळ्या काढल्या जातात. शोभा यात्रा निघतात. पण यावेळी मात्र पाडव्याच्या उत्साहावर कोरोना व्हायरसने पाणी फिरले आहे. भारतात कोरोनाने १० लोकांचा मृत्यू झालाय तर ५०० पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर देशातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशातील ३० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये लॉकडाऊन आहे तर देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे. रेल्वे बसेस खाजगी वाहने बंद आहेत. सरकारने जणू काही लोकांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवले आहे. अशा परिस्थितीत कसा गुढीपाडवा साजरा करणार ? आणि कशासाठी गुढ्या उभ्या करायच्या? मात्र या संकटावर मात करण्याचा संकल्प मात्र करायला हवा. भारतात कोरोना कसा आला आणि कसा फैलावला हे आता सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि हे संकट काही एकट्या भारता पुरते मर्यादित नाही तर संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात आहे. तब्बल तीन लाख लोक जगभर कोरोना बाधित असून त्यातील १५ हजार लोकांचा मृत्यू झालाय आणि तितकेच लोक मृत्यूच्या छायेत अत्यंत गंभीर अवस्थेत आहेत. त्यामानाने भारतात परिस्थिती आटोक्यात आहे. मात्र तरीही कोरोनाशी लढत असताना लोक आज कुठलेही सणवार साजरे करण्याच्या मनस्थितीत नाहीत तर आज माणसाचा जीव कसा वाचेल याचीच लोकांना फिकीर आहे त्यामुळे आजच्या पाडव्याचे कोणालाही फारसे घेणेदेणे नाही फार तर कोरोना मुळे लोक घरात असल्याने घरातच संपूर्ण कुटुंबासोबत पाडवा साजरा करू शकतील पण त्यातही आनंद ऐवजी चिंताच अधिक असेल कारण कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांनी शंभरी ओलांडली आहे. एकट्या मुंबई शहरात कोरोनामुळें चार जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे परिस्थिती भीतीदायक आहे. अशावेळी आजच्या दिवशी कोरोनाशी लढण्याचा संकल्प करणे हेच प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी सरकारने ज्या सूचना केल्या आहेत त्या पाळायला हव्यात. संचारबंदी असताना घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घरा बाहेर पडण्यासाठी सरकारने जी वेळ दिली आहे त्या वेळेतच लोकांनी घराबाहेर पडायला हवे. गर्दीतून होणार संसर्ग टाळण्यासाठीच सरकारला हे सगळे करावे लागत आहे त्यामुळे जबाबदार नागरिक या नात्याने आपणही सरकारला सहकार्य करून कोरोना विरुद्धच्या लढाईत सामील होण्याचा संकल्प आज नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर करायला हवा. तसे हे संकट काही कायमचे राहणारे नाही आज ना उद्या ते दूर होईल पण ते असेच दूर होणार नाही.संकट कुठलेही असो ते दूर करण्यासाठी त्या संकटाच्या विरोधात धाडसाने लढावे लागते तेंव्हाच ते संकट दूर होऊ शकते. आज आपल्या वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर, नर्सेस वॉर्ड बॉय अन्य रुग्णालय कर्मचारी, जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन, पोलिस आणि सरकार असे सर्वजण दिवसरात्र कोरोनाच्या संकटाशी लढत आहेत मात्र ही लढाई फक्त त्यांचीच नाही तर या देशातील प्रत्येकाची ही लढाई आहे त्यामुळे सर्वांनी त्यात सामील होऊन, लढून जर कोरोनाला घालवले तर पुढच्या वर्षीच्या पाडवा आपल्या सर्वांसाठी अधिक गोड आणि आनंदी असेल. लोकांना घरात राहणे कठीण जातेय हे खरे आहे. कारण मुंबईसारख्या महानगरांमध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर फिरायची सवय आहे. त्यामुळे संचारबंदीचां हा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण आहे पण आज माणसांच्या घरातही मनोरंजनाची खूप साधने आहेत. टिव्हीवर मनोरंजनाचे शेकडो चॅनल आहेत ज्यामध्ये व्हिडिओ गेम पासून जुने नवे चित्रपट, टिव्ही सिरीयल, स्पोर्ट्स, डिस्कवरी यासारख्या चॅनलवर अनेक कार्यक्रम पाहून वेळ घालवता येऊ शकतो शिवाय मोबाईल मध्ये इंटरनेट असल्याने त्यावर हवे ते बघता येते व्हाट्सअप द्वारा मित्रांशी सतत संवाद साधता येतो  आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लोक वर्षोनुवर्षे कामामध्ये गुंतलेले असतात त्यामुळे ज्यांना कुटुंबाला वेळ देता येत नाही असे लोक या काळात कुटुंबासह एकत्र राहून कौटुंबिक आनंद घेऊ शकतात. पैसा तर काय कधीही मिळू शकतो पण कौटुंबिक सुख आणि कुटुंबासह एकत्र राहण्याचा आनंद शहरी भागातील लोकांना सहसा मिळत नाही पण कोरोनाच्या निमित्ताने का होईना जर हा कौटुंबिक आनंद मिळत असेल तर प्रत्येकाने तो घ्यायला हवा आणि त्यासाठीच घरात बसून राहायला हवे म्हणजे संचारबंदीच्या काळात पोलिस यंत्रणेवरील ताण पडणार नाही आणि संचारबंदी लावण्याचा सरकारचा उद्देश ही सफल होईल.


संपादकीय (दै.आदर्श महाराष्ट्र- २५-०३-२०२०)

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट