कोरोना या महाभयंकर संसर्ग रोगाला रोखण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व आवारातील तसेच इतर विविध व्यवसायातील व्यापारी व माथाडी कामगारांचा दि. २५ मार्च २०२० पर्यंत बंद... त्यानंतर परिस्थिती नुसार पुढील निर्णय घेणार.….

माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील

नवीमुंबई  :- कोरोना या महाभयंकर संसर्ग रोगाने जगभर थैमान घातले आहे, या रोगाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने काही कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयानुसार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवी मुंबईतील कांदा- बटाटा मार्केट,मसाला मार्केट, अन्न-धान्य मार्केट , फळे व भाजीपाला मार्केट आवारातील तसेच ट्रान्सपोर्ट, ग्रोसरी, भाजीपाला, रेल्वे, आयर्न व स्टील, क्लिअरिंग, मेटल व पेपर, कापड, कापूस आणि अन्य व्यवसायातील व्यापारी व तमाम माथाडी कामगारांनी बुधवार दि. २५ मार्च २०२० पर्यंत बंद पाळला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस नामदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील,कार्याध्यक्ष व माजी मंत्री शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दि. २५ मार्च २०२० नंतर परिस्थिती ज्याप्रमाणे निर्माण होईल त्याप्रमाणे पुढील निर्णय घेतला जाईल असेही माथाडी कामगार नेत्यांनी या पत्रकात म्हटले आहे.

             नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हजारो व्यापारी आपला व्यवसाय करतात, त्यांचेकडे ग्रोसरी व भाजीपाला बोर्डात नोंदीत असलेले माथाडी, वारणार, मापाडी, पालावाला महिला कामगार व अन्य घटक कामे करतात. याठिकाणी महाराष्ट्र व इतर राज्यातून मालाचे ट्रक्स व कंटेनर येतात. या बाजार आवारात अनेक लोक मालाची खरेदी करण्यासाठी येत असतात. परंतु मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने कोरोना या महाभयंकर रोगाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सुचविलेल्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत, बाजार आवारात येणाऱ्या व्यक्तींची गेटवर तपासणी होणे, व्यापारी वर्ग त्यांचेकडे काम करणारे घटक व कष्टाची कामे करणाऱ्या अन्य घटकांना मास्क देणे, सॅनिटायजर व पाण्याची व्यवस्था करणे याबाबतीत बाजार समितीने कोणतीही व्यवस्था केलेली नाही.

             कष्टाची कामे करणाऱ्या कामगारांची कामे अंगावरील स्वरूपात असून त्यांना काम केले तरच मजुरी मिळते परंतु जीव मुठीत घेऊन कामावर येणाऱ्या कामगार व व्यापाऱ्यांनी त्यांच्या आरोग्याला धोका होऊ नये म्हणून सर्व टोळ्यांच्या मुकादम व कार्यकर्त्यांनी दि. २१ मार्च २०२० रोजी वाशी येथील माथाडी भवन मध्ये येऊन दि.२५ मार्च २०२० पर्यंत कामे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नवीमुंबईतील बाजारसमितीच्या आवारातील कामाबरोबर ट्रान्सपोर्ट, आयर्न व स्टील, मेटल व पेपर, रेल्वे यार्ड, कापड, कापूस, क्लिअरिंग, खोका व्यवसायातील व्यापारी व कामगारांनी देखील दि २५ मार्च २०२० पर्यंत आपली कामे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

        सध्याच्या जगभरातील कोरोना व्हायरसच्या आणीबाणीच्या प्रसंगामुळे केंद्र व राज्य सरकारने लागू केलेल्या आरोग्यसंबंधीच्या सूचनेनुसार आणि  माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या शिस्त व सरकारी कायदे पाळण्याच्या शिकवणुकीनुसार व्यापारी व तमाम माथाडी कामगारांनी सतर्क राहून माथाडी कामगारांच्या आणखी एका सामाजिक कार्याची शान वाढवू या असे आवाहन नामदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले आहे.

       कष्टाची कामे करणाऱ्या कामगारांची ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ उभी करणाऱ्या स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त दि. २३ मार्च २०२० रोजी केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याचेही नरेंद्र पाटील यांनी शेवटी पत्रकात म्हटले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट