वाढदिवसाचा केक खाल्ला १० वर्षाच्या मुलीचा झाला मृत्यू

पतियाळा : वाढदिवस असो किंवा कुठलाही आनंदाचा दिवस, केक कापून आणि खाऊन तो साजरा करण्याचा नवीन ट्रेंड आहे; पण आपण कुठून केक आणतो, तो बनवताना वापरलेल्या गोष्टी खाण्यायोग्य आहेत की नाही अशा अनेक बाबतीत सतर्क राहण्याची गरज असते. केक खाल्ल्यानंतर त्यातल्या सिंथेटिक रंगांमुळे दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची बाब पतियाळामध्ये घडली आहे.

अत्यंत लाडात वाढवलेल्या लेकीच्या १०व्या वाढदिवसासाठी ऑनलाइन ऑर्डर केलेला केक तिच्या मृत्यूचं कारण ठरावा अशी अत्यंत दुर्दैवी घटना या पालकांच्या बाबतीत घडली आहे. दिसायला छान, बघताक्षणीच खावासा वाटावा असा लेकीचा आवडता चॉकलेट केक ऑर्डर केला. तो केक खाल्ल्यावर घरातले सगळेच जण आजारी पडले. वाढदिवस असलेल्या मुलीचा तर या केकने जीव घेतला. अन्न आणि औषध प्रशासनाने या केकचे नमुने तपासले तेव्हा धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

मानवी असं या १० वर्षांच्या मुलीचं नाव होतं. २४ मार्चला तिचा वाढदिवस होता. पतियाळातल्या ‘केक कान्हा’मधून तिच्यासाठी तिच्या आवडीचा चॉकलेट केक ऑर्डर करण्यात आला होता. तो खाल्ल्यानंतर मानवी आणि तिच्या धाकट्या बहिणीसह सगळेच आजारी पडले.

मानवीच्या आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार केक खाल्ल्यानंतर सगळ्यांना उलट्या झाल्या. मानवीचं तोंड कोरडं पडत होतं. सतत तहान लागत होती. त्यानंतर ती बेशुद्ध पडली म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिला ऑक्सिजन लावण्यात आला; मात्र थोड्याच वेळात तिचा मृत्यू झाला. त्यामुळे केकमध्ये विषारी पदार्थ असल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे.

हे प्रकरण गंभीर असल्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने केकचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यात सिंथेटिक स्वीटनर वापरल्याचं स्पष्ट झालं. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जिंदल यांच्या मते केकमध्ये सॅकरिन आणि कृत्रिम स्वीटनर वापरण्यात आला होता. खाद्यपदार्थ किंवा पेयांमध्ये सॅकरिनचं प्रमाण अत्यल्प असतं. ते वाढलं असता ब्लड शुगर प्रचंड वाढून जीव जाऊ शकतो, असंही डॉ. जिंदल यांनी सांगितलं. बेकरी मालकाविरोधात एफआयआर करण्यात आला असून, या प्रकरणात त्याला कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे. त्याला अटक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट