....अखेर ठरल्याप्रमाणे शिंदेंच्या सेनेची सरशी! १६ बंडखोर आमदार ठरले पात्र !

शिंदे गट हीच खरी 'शिवसेना' ; अपेक्षित निकालावर विधानसभा अध्यक्षांकडून शिक्कामोर्तब


मुंबई: राज्याच्याच नव्हे तर देशासाठीही महत्वाचा असणारा शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर जाहीर झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र ठरले आहेत. त्यामुळं राज्याच्या राजकारणातील स्थिती जैसे थे आहे. यामुळं ठाकरे गटाला मात्र मोठा धक्का बसला आहे.
निकालापूर्वी चेंबरमध्ये विधिमंडळ सचिव आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा पार पडली. त्यानंतर नार्वेकर सेन्ट्रल हॉलमध्ये दाखल झाले आणि काही वेळातच त्यांनी निकाल वाचनाला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनासाठी त्यांचे आभार मानले. तसेच ज्यांनी आपल्याला या कामात मदत केली त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आणि त्यांच्या वकिलांचे देखील नार्वेकरांनी यावेळी आभार मानले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना हा खरा शिवसेना पक्ष असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं. तसेच या शिवसेनेनं नेमलेला व्हिप भरत गोगावले हेच अधिकृत व्हिप म्हणूनही त्यांनी मान्यता दिली. तसेच यामुळं शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असंही यावेळी नार्वेकर यांनी म्हटलं.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार खरी शिवसेना कोणती हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं. पक्षाची घटना, नेतृत्व आणि विधीमंडळ बहुमत यांचा विचार करून निर्णय घेतला जात आहे, असं त्यांनी म्हटलं.
पक्षाच्या घटनेबद्दल बोलताना राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, “दोन्ही गटांकडून घटना मागवल्या गेल्या होत्या. उद्धव ठाकरेंकडून २०१८ सालातील घटना सादर केली होती. मात्र ही घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नाही." २०१८ साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल ग्राह्य धरले जाणार नसून १९९९ साली निवडणूक आयोगाला सादर केलेली घटनाच स्वीकारली जाईल, असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं.
२३ जानेवारी २०१८ साली संघटनात्मक अंतर्गत निवडणुका झाल्याचं सुनील प्रभू यांनी म्हटलं होतं, मात्र प्रतिपक्षाकडून अशा निवडणुका झाल्या नसल्याचं पुराव्यानिशी सिद्ध केलं गेलं, असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट