
अल्पसंख्यांकासाठीच्या विविध योजनांची गतीने अंमलबजावणी करा ; अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांचे निर्देश
- by Adarsh Maharashtra
- Nov 13, 2018
- 1439 views
कोल्हापूर,दि. 13 : अल्पसंख्यांक समाजासाठीच्या विविध योजना त्या-त्या लाभार्थीपर्यत प्रभावीपणे पोहचवून त्या योजनांची गतीने अंमलबजावणी करा, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात अल्पसंख्यांक समाजासाठीच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीधर पाटणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, पोलीस उपाधिक्षक सतीश माने यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अल्पसंख्यांकांमध्ये मुस्लिम,ख्रिश्चन, बौध्द,शीख,पारशी आणि जैन या समाजांचा समावेश असून या समाजातील तरूण-तरुणींना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या अधिकच्या संधी उपलब्ध करून देण्यासही सर्व यंत्रणांनी सक्रीय व्हावे, असे आवाहन करून अध्यक्ष हाजी अराफत शेख म्हणाले,अल्पसंख्यांक समाजासाठी कौशल्य विकासाच्या दृष्टिनेही प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी अधिकचे रोजगार मेळावे घेण्याबरोबरच तरूणांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देण्यावरही भर द्यावा.
अल्पसंख्यांक समाजातील तरूणांना विविध व्यवसाय उद्योगाच्या माध्यमातून व्यवसाय, उद्योगाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मौलाना आझाद महामंडळाला गती दिली असून शासनाने या महामंडळासाठी 400 कोटीची तरतूद केली आहे. या महामंडळामार्फत अन्य मोठ्या उद्योग व्यवसायासाबरोबरच रिक्षा, टॅक्सी, टेंम्पो अशा छोट्या-मोठ्या उद्योगासाठीही कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी सांगितले.
अल्पसंख्यांक समाजातील अंगणवाडी तसेच शाळामधील विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगून अध्यक्ष हाजी अराफत शेख म्हणाले, मदरशांच्या माध्यमातून अल्पसंख्यांक मुलांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्याच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अल्पसंख्यांक युवकांची आर्थिंक, सामाजिक, शैक्षणिक उन्नती साधून त्यांच्यात सकारात्मक बदल घडविण्याच्या कामासही प्राधान्य दिले जाईल असेही ते म्हणाले. अल्पसंख्यांक समाजातील युवकांसाठी पोलीस भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनाही प्रभावीपणे राबवावी, अशी सूचना त्यांनी केली.
याप्रसंगी महसूल,पोलीस,जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण, अग्रणी बँक, कौशल्य विकास, आयटीआय,वनविभाग,क्रीडा विभाग आदि विभागामार्फत अल्पसंख्यांक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा यावेळी अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी सविस्तरपणे आढावा घेतला. या बैठकीस शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी आशा उबाळे,किरण लोहार, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, आयटीआयचे प्राचार्य जतीन पारगावकर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत,सहाय्यक वनसंरक्षक श्री. गोसावी यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधी मंडळाच्या भेटी घेतल्या. जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत, अश्या अनेक लोकांनी आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. त्याचा अभ्यास करून सरकार दरबारी त्याची तड लावून देण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळांना दिले.
ख्रिश्चन आणि लिंगायत समाजाच्या दफनभूमी च्या जागेबाबतचा गंभीर मुद्दा यावेळी त्यांच्यासमोर आला, जिल्हाधिकारी आणि प्रशासन यांच्या मध्यस्थीने हा प्रश्न मार्गी लागावा, अश्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम