पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात,कोरोना संकटात निवडणूक घेणारं पहिलं राज्य

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ७१ जागांसाठी मतदान होणार असून १०६६ उमेदवारांचं भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने निवडणूक आयोगाकडून ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसंच इतर नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडी यांच्यात चुरस आहे. पहिल्या टप्प्यातील ७१ जागांपैकी संयुक्त जनला दल ३७ तर भाजपा २९ जागा लढत आहे. तर राष्ट्रीय जनता दलाने ४२ ठिकाणी उमेदवार उभे केले असून त्यांचा मित्रपक्ष काँग्रेस २० ठिकाणी लढत आहे.

पहिल्या टप्प्यात २.१४ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये १.१ कोटी महिला आणि ५९९ तृतीयपंथी आहेत. दरम्यान करोना संकटात इतकी मोठी निवडणूक घेणारं बिहार पहिलं राज्य ठरलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगा कडून चोख तयारी करण्यात आली आहे. बिहारमध्ये जवळपास ७.२९ कोटी मतदार आहेत.

मोदींचं ट्विट करुन मतदानाचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत बिहारमधील नागरिकांना सुरक्षेची काळजी घेत मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे. मास्क तसंच सोशल डिस्टन्सिंग नियमांची मोदींनी आठवण करुन दिली आहे.

मोदी आणि राहुल गांधींची प्रचारसभा

एकीकडे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या प्रचारसभा पार पडणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या दरभंगा, मुझफ्फरपूर, आणि पाटणा अशा तीन ठिकाणी प्रचारसभा होणार आहेत. तर राहुल गांधी यांच्या वाल्मिकीनगर आणि कुशेश्वर अस्थान येथे प्रचारसभा नियोजित आहेत.

बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजपा यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट