चौथ्या स्तंभाचा कडेलोट

"लॉक डाऊन लॉक डाऊन किती कराल लॉक डाऊन ! भीक मागायची पाळी आली मरायचे का विष खाऊन?"

लॉक डाऊन हा कोरोनाच्या प्रादुर्भावावर अंतिम उपाय नाही असे देशवासी ओरडून सांगत असतानाही सरकारने पुन्हा पुन्हा लॉक डाऊन करून देशाचा तुरुंग करून टाकलाय. तब्बल चार वेळा लॉक डाऊन करूनही देशातील कोरोना ग्रस्तांची संख्या कमी झालेली नाही उलट वाढतच चालली आहे आणि लॉक डाऊनच्या दोन महिन्यानंतरही देशात एक लाख बत्तीस हजार कोरोना ग्रस्त आहेत ज्यामध्ये तीन हजार आठशे लोकांचा मृत्यू झालाय याचा अर्थ लॉक डाऊनचा पर्याय पूर्णपणे फसला आहे तरी सुद्धा सरकार पाचव्या लॉक डाऊनची तयारी करीत आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे भरपूर रेशनपानी आहे,ज्यांच्याकडे सर्व सुखसोयी आहेत त्यांच्यासाठी लॉक डाऊन दोन महिने काय दोन वर्ष चालला तरी फरक पडत नाही अशा लोकांमध्ये मोठे राजकीय पुढारी, उद्योगपती, सिने जगतातले सेलिब्रिटी, दोन नंबरचा धंदा करणारे माफिया हे लोक येतात त्यांच्याकडे अफाट पैसा आहे. पण जे गरीब मध्यमवर्गीय नोकरदार आहेत त्यांचे काय?अशा लोकांमध्ये प्रिंट मीडिया मधले पत्रकार सुद्धा येतात जे स्वतःचा जीव धोक्यात घालून आज कोरोनाग्रस्तांपर्यंत पोचून तिथलं कव्हरेज घेऊन बातम्या बनवून लोकांपर्यंत पोहचवत असतो एकतर प्रिंट मीडियामध्ये जॉब सिक्युरिटी नसते त्यातच जे छोटे पेपर असतात त्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही आणि या लॉक डाऊन मुळे तर छोटे पेपर बंद पडायच्या मार्गावर आहेत मग अशा छोट्या वर्तमान पत्रांमध्ये काम करणाऱ्या माणसाने अशा लॉक डाऊनच्या काळात काय उपाशी मरायचे का? त्यांना वाली कोण? प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणताना मग या चौथ्या स्तंभाची जबाबदारी सरकारची नाही का?सरकार पत्रकारांसाठी का नाही एखादे पॅकेज जाहीर करीत? म्हणजे पत्रकाराने फक्त सरकार आणि जनतेत दुवा साधण्याची हमाली करायची? लॉक डाऊन मध्ये तो आणि त्याचे कुटुंब उपाशी तडफडून मेले तरी चालेल सरकारला त्याच्याशी घेणं देणं नाही हीच भूमिका आज सरकारची दिसतेय. एकतर प्रिंट मीडिया समोर समस्यांचा डोंगर उभा आहे कारण कागदाचे दर आणि छपाईचा खर्च प्रचंड वाढलाय अशा परिस्थितीत कर्ज काढून कसेतरी छोटे पेपर चालवले जात होते पण लॉक डाऊन मुळे सर्वच उद्योगधंदे बंद पडल्याने या पत्रकारितेच्या व्यवसायातील लाखो पत्रकारांवर आज उपासमारीची पाळी आलीय .पत्रकार हा बुद्धिजीवी वर्ग आहे तो नेहमीच समाजासोबत असतो किंबहुना तो समाजाचा आईनाच आहे त्यामुळे हा वर्ग जगायला हवा आणि त्याला जगवायची जबाबदारी सरकारची आहे पण या लॉक डाऊनच्या काळात सरकारला जणू प्रिंट मिडीयाचा विसर पडलाय. सरकार मधल्या मंत्र्या संत्र्याना आज इलेक्ट्रॉनिक मिडियाचे कॅमेरे आणि बूम दिसत आहेत त्यामुळे वर्तमान पत्र चालू आहेत की बंद पडलीत याकडेही बघायला त्यांना वेळ नाही हा एक प्रकारे अन्याय असून प्रिंट मीडियाने सरकारला याचा जाब विचारायला हवा.

 लॉक डाऊनला आमचा विरोध नाही पण तो किती वेळ करणार? कोरोनाच्या भीतीने सारखा सारखा लॉक डाऊन करून देशातले उद्योगधंदे किती दिवस बंद ठेवणार आहेत? आज लॉक डाऊन मुळे दोन महिने लोक घरात बसून आहेत त्यातील कित्येक लोक बेरोजगार झालेत कारण त्यांचे कारखाने पुन्हा चालू होतील की नाही याचा भरोसा नाही. पत्रकारितेतील पत्रकारांना तर आता भवितव्यच राहिलेलं नाही कारण अगोदरच डबघाईला आलेला हा व्यवसाय आता पूर्णपणे बुडण्याच्या मार्गावर आहे .त्यामुळे या व्यवसायातल्या लोकांना आता विष खाऊन मरण्याची पाळी आली आहे. केंद्र सरकारने म्हणे २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले पण ते पॅकेज नसून कर्ज आहे ही वस्तुस्थिती आतापर्यंत लोकांच्या लक्षात आलीय पण या पॅकेज मध्येही वृत्तपत्र व्यवसायासाठी काही नाही. छोटी वृत्तपत्र हा सुद्धा एक छोटा व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय आज पूर्णपणे अडचणीत आलेला आहे त्यामुळे सरकारने या व्यवसायाला आणि या व्यवसायात काम करणाऱ्या पत्रकारांना मदत करायला हवी पण दुर्दैवाने या व्यवसाया बद्दल केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार कोणालाही पडलेली नाही मात्र त्यांच्या विरोधात बातम्या छापल्या की त्यांना मिरची लागते पण एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी. आज लॉक डाऊन मध्ये जो पत्रकार भुकेचे चटके सहन करतोय पोराबाळांचे हाल बघत अश्रू पित एकएक दिवस ढकलतो आहे तोच पत्रकार उद्या लॉक डाऊन संपल्यावर पुढाऱ्यांचे कपडे फाडून त्यांना जनतेच्या दरबारात नागडे केल्याशिवाय राहणार नाही. कारण पत्रकाराची लेखणी ही तलवारी पेक्षा धारदार असते तिने आजवर कधीही कोणाची तमा बाळगली नाही हे आज लॉक डाऊन मध्ये तमाशा बघणाऱ्यांनी ध्यानात ठेवावे. आज जी काही परिस्थिती निर्माण झालीय तिला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे कारण त्यांनी २१ दिवसाच्या पहिल्या लॉक डाऊन ची अमलबजावणी बंदुकीच्या जोरावर केली असती तर कुणीही घराबाहेर पडले नसते  आणि लोक घराबाहेर पडले नसते तर कोरोनाचा असा भयंकर फैलाव झाला नसता तेंव्हा केंद्राच्या चुकीच्या धोरणाची शिक्षा आज १३७ कोटी जनता लॉक डाऊनच्या रूपाने भोगत आहे. लॉक डाऊन बद्दल लोकांच्या मनात प्रचंड असंतोष आहे आणि त्याचा केंव्हाही उद्रेक होऊ शकतो

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट