आज राममंदिर खटल्याचा निकाल, देशभरात हायअलर्ट

नवी दिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष ज्या खटल्याकडे लागलं आहे, त्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालय आज  आपला निकाल सुनावणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आज सकाळी साडेदहा पासून निकाल वाचन सुरू करणार आहे. दरम्यान अयोध्या खटल्यावरील निकालाच्या पार्श्वभूमीवर आधीच देशभरात सुरक्षेच्या दृष्टीने सरकारकडून खबरदारी घेण्यात आली आहे. अयोध्येलाही पोलीस छावणीचे स्वरूप आलेले आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद वाद १०६ वर्षे जुना आहे. ब्रिटिशकाळापासून या वादावर कोर्ट कचेऱ्या सुरू आहेत. फैजाबाद जिल्हा न्यायालय ते सुप्रीम कोर्ट या प्रवासा दरम्यान या वादाने देशातील वातावरण ढवळून निघालं. या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ आज निकाल देणार असल्याने त्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. ६ ऑगस्टपासून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने अयोध्या खटल्यावर दररोज सुनावणी घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी घटनापीठाने अयोध्या प्रकरणी १७ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होईल व १७ नोव्हेंबरपर्यंत निकाल दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार १६ ऑक्टोबर रोजी अयोध्या खटल्याची सुनावणी पूर्ण करत घटनापीठाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. हा निकाल ४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या दरम्यान कोणत्याही तारखेला दिला जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, आता आज देण्यात येणार असल्यामुळे सगळ्यांच्याच नजरा निकालाकडे लागल्या आहेत.

उत्तर प्रदेशात ४५० जणांची धरपकड
   उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठी काळजी घेतली जात आहे. पोलिसांकडून जवळपास १६५९ सोशल मीडिया अकाऊंट्सवर नजर ठेवली जात आहे, शिवाय गरज पडल्यास इंटरनेट सेवाही बंद केली जाऊ शकते, अशी माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी दिली.  अयोध्येसह काही संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून पोलिसांकडून प्रत्येकाची तपासणी होत आहे, असं ते म्हणाले. उत्तर प्रदेशात गर्दी आणि अफवा रोखणं याला पोलिसांचं प्राधान्य असल्याचं ओपी सिंह म्हणाले. निमलष्करी तुकड्यांची मागणी केली असून ४० तुकड्या दाखल झाल्या आहेत, आणखी ७० तुकड्यांची आवश्यकता आहे. पोलिसांव्यतिरिक्त या तुकड्यांचं काम सुरु असेल, अशी माहितीही ओपी सिंह यांनी दिली.




 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट