
जाळे फाडून होणार दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण;जाळ्याच्या नुकसान भरपाईपोटी 25 हजार
- by Adarsh Maharashtra
- Dec 27, 2018
- 1265 views
मुंबई: समुद्रातील दुर्मिळ प्रजातींचे आता संरक्षण होणार असून मासेमारी करताना मच्छिमारांच्या जाळ्यात अशा दुर्मिळ आणि संरक्षित प्रजाती अडकल्यास मासेमारी जाळे फाडून किंवा कापून त्या प्रजातींना पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार. असे करताना मच्छिमारांना मासेमारी जाळ्याच्या नुकसान भरपाईपोटी २५ हजार रुपये अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
समुद्रात कासव, डॉल्फिन, शार्क आणि इतर दुर्मिळ प्रजाती आढळतात, ज्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे. मासेमारी करताना अनेकदा अशा प्रजाती मासेमाऱ्यांच्या जाळ्यांमध्ये अडकतात, त्यांना सोडवण्यासाठी मच्छिमार सुद्धा प्रयत्न करतात परंतु असे करताना मच्छिमाऱ्यांच्या जाळ्याचे नुकसान होते. त्यामुळे काही वेळेस मच्छिमार अशा प्रजाती पुन्हा समुद्रात सोडण्याचा प्रयत्न करत नाहीत. समुद्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण व्हावे, आणि त्यांची सुटका करताना मासेमारी जाळे फाटल्याने किंवा कापल्याने मच्छिमार बांधवांचे होणारे नुकसान ही टाळता यावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे असे सांगून श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, हे अनुदान मुख्य वन संरक्षक, कांदळवन विभाग यांच्या कांदळवन कक्षामार्फत अटी आणि शर्तीच्या अधीन राहून देण्यात येईल.
असे नुकसानभरपाई अनुदान मागताना मच्छिमारांनी नौका मालकाचे नाव, पूर्ण पत्त्यासह अनुदानाचा अर्ज, नौकेचे नाव व क्रमांक,मासेमारी परवाना, नौका नोंदणी प्रमाणपत्र, नौकेवर उपस्थित सर्व सदस्यांची नावे आणि आवश्यक कागदपत्रे, ज्या ठिकाणी दुर्मिळ प्रजाती सापडल्या आहेत त्या ठिकाणचे जीपीएस क्रमांक, जाळी फाडताना व दुर्मिळ प्रजातींची सुटका करतानाचे छायाचित्र व चित्रफीत सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे.
दुर्मिळ प्रजातींच्या संरक्षणाचे देणार प्रशिक्षण
समुद्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण करण्याबाबत मच्छिमारांमध्ये जनजागृती करण्याकरिता वन विभागाच्या अखत्यारितील कांदळवन कक्षामार्फत सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्यास्तरावर दोन महिन्यांनी मच्छिमार सहकारी संस्थेत जाऊन प्रशिक्षण देण्यात येईल, यासाठी लागणारा प्रती प्रशिक्षणाचा खर्च ही कांदळवन कक्षामार्फत करण्यात येईल असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, समुद्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण करण्याबाबत मच्छिमारांमध्ये जनजागृती करण्याकरिता मत्स्यव्यवसाय विभाग आणि वन विभागाचा कांदळवन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कार्यशाळा ही आयोजित करण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने निर्गमित केल्याचेही त्यांनी सांगितले.
००००
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम