
ठाकरे गट सावध, ऋतुजा लटकेंचा राजीनामा लटकला, तर पुढे काय
- by Adarsh Maharashtra
- Oct 12, 2022
- 294 views
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत एकमागून एक धक्कादायक वळणं येतच आहेत. एकीकडे ऋतुजा लटकेंच्या महापालिकेतील नोकरीचा राजीनामा मंजूर केला जात नसल्यामुळे ठाकरे गटाची मोठी कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे लटकेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सावध झाल्याचं कळतंय. ऋतुजा लटकेंची उमेदवारी राजीनाम्याच्या मंजुरीअभावी अडचणीत आली, किंवा त्या शिंदे गटात गेल्या, तर नामुष्की टाळण्यासाठी ठाकरेंनी बॅकअप प्लॅन तयार ठेवल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरे यांनी अंधेरी पूर्व येथील दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु पाच दिवसांपूर्वी ऋतुजा लटके आपल्या मुलासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याची चर्चा सुरु झाली. या चर्चा ठाकरेंतर्फे धुडकावून लावल्या जात असल्या तरी कुठलीही रिस्क घेण्याची सध्या ठाकरेंची तयारी नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या लटकेंचा दारोदार प्रचारही सुरु झाला होता. परंतु त्यांच्यासमोरही आता अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
ऋतुजा लटके आपल्यासोबत राहतील, असा ठाकरेंना विश्वास आहेच. शिवसेना नेते अनिल परब आणि अरविंद सावंत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत ते अधोरेखितही केले. मात्र ऋतुजा लटकेंची उमेदवारी राजीनाम्याच्या मंजुरीअभावी लटकली किंवा त्यांनी दबावापोटी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला, तर पर्यायी उमेदवार देण्याची चाचपणी ठाकरेंनी सुरु केली आहे. शिवसेनेचा शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख किंवा गटप्रमुख अशा स्थानिक पदाधिकाऱ्यांना तिकीट देण्याबाबत ठाकरे गटाकडून चाचपणी सुरु आहे.
ऋतुजा लटकेंच्या महापालिकेतील नोकरीचा राजीनामा मंजूर केला जात नसल्यामुळे ऋतुजा यांची मोठी कोंडी झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख अवघ्या दोन दिवसांवर आल्यामुळे ठाकरेंसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
दरम्यान, भाजपचे संभाव्य उमेदवार मुरजी पटेल माघार घेण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील 'बाळासाहेबांची शिवसेना' अंधेरीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीही शहरात शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाला अखेर ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे शिंदे गटाचा कॉन्फिडन्स वाढला आहे. त्यामुळे भाजपला जागा सोडण्याऐवजी शिंदे गटच हक्काच्या मतदारसंघात उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीमध्ये ही निवडणूक लढवतील, असं विश्वसनीय सूत्रांचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम