
नाशिकमध्ये 'बर्निंग बस'; पहाटे प्रवासी गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला, काय घडलं?
- by Adarsh Maharashtra
- Oct 08, 2022
- 390 views
नाशिक : नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. पहाटेच्या सुमारास बसमधील अनेक प्रवासी झोपेत असतानाच काळाचा घाला आला. खाजगी बसला आग लागून १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही आग एवढी भीषण होती की काही वेळात झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. त्यानंतर घटनेची माहिती आगीसारखी शहरात पसरली. काहींनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही आगीतच होरपळले. नेमकं काय घडलं?
नाशिकमधील बस आग दुर्घटनेत १० मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी गंगाठरन डी यांनी दिली आहे. तर २१ प्रवासी जखमी असून यापैकी एकजण गंभीर जखमी असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून दुसरीकडे पुढील उपचारांसाठी हलवण्यात येणार असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहचले असून पाहणी केली जात आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी करत माहिती दिली आहे की, ''या आगीत होरपळून काही जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.''
बसचा अक्षरश: कोळसा, अनेक प्रवाशांचा मृत्यू
नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही भीषण घटना घडली आहे. मिरची हॉटेल परिसरात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बसमधील काही क्षणात जळून खाक झाली आहे. आग एवढी भीषण होती की काही वेळात आगीत झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. चिंतामणी ट्रॅव्हलची ही यवतमाळ येथून मुंबईकडे निघालेली बस होती. दरम्यान नाशिकमधून ही बस मुंबईकडे मार्गस्थ झाली असतांना पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या सुमारास ही घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी यांनी सांगितले.
प्रवासी गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला
नाशिक सिटी लिंक बस सेवेच्या माध्यमातून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. जखमींवर उपचार सुरू झाले आहेत. प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक आवाज झाला आणि सर्व प्रवाशी जागे झाले, मात्र बसच्या अनेक भागात आग पसरली होती. अनेकांनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला.
दरम्यान स्थानिक नागरिकांना बस जळत असल्याचे त्यांनी घटनेची पोलिसांसह अग्निशमन दलाला कळविली. त्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले, त्यांनी उड्या मारल्या तर आगीमुळे अनेक प्रवासी जळून खाक झाले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम