जातीअंत करण्याची शपथ घेऊन वीरमाता जिजाऊंना कृतिशील अभिवादन करण्याचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांचे राज्यातील जनतेला आवाहन.

विरमातेचा जन्मदिन 'जातीअंत दिन' म्हणून साजरा करण्यात यावा.

मुंबई (प्रतिनिधी) बहुजन प्रतिपालक स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देऊन स्वराज्य रक्षक महावीर संभाजी महाराजांना घडविणाऱ्या आणि महाराणी ताराराणी ह्यांच्यासह देशातील करोडो महिलांच्या प्रेरणास्त्रोत ठरलेल्या वीरमाता जिजाऊंच्या १२ जानेवारी रोजी असणाऱ्या ४२३ व्या महान जयंतीनिमित्त राज्यातील सर्व जनतेने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रणित मानवी स्वराज्य शाबूत ठेवण्यासाठी जातीपातींचा अंत करून प्रबुद्ध भारत निर्माण करण्याची शपथ घेऊन महान वीरमाता जिजाऊंना कृतिशील  अभिवादन करण्याचे जाहीर आवाहन भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख नेते भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी केले आहे.

उणेपूरे ७६ वर्ष आयुष्य जगलेल्या वीरमाता जिजाऊंनी ऐतिहासिक राजा महाराजांच्या , संत महात्म्यांच्या प्रेरणादायी कथा ऐकवून छत्रपती  शिवरायांवर मानवतावादी शिकवण बिंबवून जातीपातींना थारा न देणारे चक्रवर्ती सम्राट महान अशोकांच्या नंतरचे भारतातील पहिले स्वराज्य शिवरायांना निर्माण करावयास प्रेरित केले. विरमातेच्या शिकवणुकी नुसार छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यात कोणत्याही प्रकारच्या जातीभेदाला , पाखंडी धर्मांधवादाला , विकृत अंधश्रद्धेला काडीचाही थारा न देता तथागत बुद्धांनी प्रतिपादित केलेला "मानव" हा केंद्रस्थानी मानून रयतेचे-जनतेचे-लोकांचे लोकराज्य निर्माण केले , अश्या ह्या प्रेरणादायी विरमातेचा जन्मदिन हा जातीअंत दिन म्हणून पाळल्या जावा , असे आवाहन करतानाच भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी वीरमाता जिजाऊंच्या प्रतिमेसमोर 'एक वही एक पेन' अर्पण करून , जातीपातीच्या अंताची शपथ घेऊन वीरमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन करण्याचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी जनतेला आवाहन केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी राज्यातील जनतेला वीरमाता जिजाऊंची जयंती सर्व प्रकारचे शासकीय नियम पाळून आपापल्या घरातच राहून कृतिशील पद्धतीने साजरी करण्याचे विनम्र आवाहन केले आहे.

संबंधित पोस्ट