
बाणगंगेच्या ऐतिहासिक जलस्रोताला दूषित करणार्या खोदकामाला महापौरांकडून स्थगिती !
- by Adarsh Maharashtra
- Jan 02, 2021
- 634 views
मुंबई - धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असलेल्या बाणगंगा जलकुंडाच्या जवळ 'एन्.एच्.पी. ग्रुप' आणि 'डिव्हनिटी रियाल्टी' या खासगी विकासकांकडून इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे बाणगंगा कुंडातून नैसर्गिकरित्या येणारे निर्मळ पाणी पूर्णत: गढूळ होऊन हा जलस्रोत दूषित झाला आहे. या बांधकामामुळे भविष्यात हा ऐतिहासिक जलस्रोत कायमचा लुप्त होण्याचा धोका आहे. त्यामुळे हे बांधकाम आणि त्यासाठी चालू असलेले खोदकाम यांना तत्परतेने अन् कायमस्वरूपी स्थगिती द्यावी, अशी मागणी 'हिंदु जनजागृती समिती' आणि 'गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्ट' यांच्यासह अन्य संघटनांच्या वतीने मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीनंतर आज महापौरांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन अधिकार्यांसह तेथील पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या स्थानिक प्रभागच्या वरिष्ठ अधिकार्यांना सदर कामाविषयी अहवाल सादर होईपर्यंत बांधकामाच्या अंतर्गत होणार्या खोदकामाला स्थगिती देण्याचे निर्देश दिले. या भेटीच्या वेळी 'गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्ट'चे श्री. प्रवीण कानविंदे, 'हिंदु जनजागृती समिती'चे श्री. सतीश सोनार, शासकीय अधिकारी, तसेच अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी बोलतांना महापौर सौ. पेडणेकर म्हणाल्या, ''बाणगंगेच्या जवळ चालू असलेल्या बांधकामामुळे बाणगंगेचा जलस्रोत दूषित होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. माझ्याकडे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य लोकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे वस्तूस्थिती पाहण्यासाठी आज येथे आले होते. हे नैसर्गिक स्रोत जगले पाहिजे आणि वाढले पाहिजे; कारण बाणगंगा हा आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. ही संस्कृती टिकवली पाहिजे. बांधकाम व्यावसायिक येथे रात्रीचे काम करत असेल, तर त्यांच्यावर एम्.आर्.टी.पी. कायद्यान्वये कारवाई केली जाईल.''
बाणगंगा कुंड हे प्रभु श्रीरामाने प्रत्यक्ष बाण मारून निर्माण केलेले प्राचीन कुंड आहे. सप्टेंबर 2020 पासून बाणगंगा कुंडाच्या जवळ इमारत बांधण्यासाठी खोदकाम चालू करण्यात आले आहे. या खोदकामाला प्रारंभ झाल्यावर बाणगंगेमध्ये येणार्या नैसर्गिक जलस्रोतातून चिखल आणि चिखलमिश्रित पाणी कुंडामध्ये यायला लागले. बाणगंगेमध्ये येणार्या भूमीगत जलस्रोताला या खोदकामामुळे बाधा निर्माण झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे. हिंदु जनजागृती समितीच्या 'राष्ट्रीय मंदिर संस्कृती रक्षा अभियाना'च्या अंतर्गत बाणगंगेच्या जतन आणि संरक्षण यांसाठी 31 डिसेंबर या दिवशी समितीच्या शिष्टमंडळाने महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले होते. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौरांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मान. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक वारसा असलेल्या राज्यातील प्राचीन मंदिरांचे संवर्धन करण्यासाठी राज्यशासन योजना आणणार असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे महापौरांनी या विषयात लक्ष घातल्याची जनमानसात भावना आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम