शरद पवारांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही नांदगावकरांचं टीकास्त्र

मुंबई, दि.१९ : कोरोना काळात आलेली वाढीव वीजबिलं सोमवारपर्यंत माफ करा, अन्यथा मनसेच्यावतीनं राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा अल्टिमेटम मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी दिला जात आहे. ही महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेची घोर फसवणूक आहे. त्यामुळे सरकारला ठिकाण्यावर आणण्यासाठी मनसेच्या आंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं, जर वीज मंडळाचे कर्मचारी वीज कनेक्शन कापायला आले तर मनसेचे कार्यकर्ते ग्राहकांसोबत असतील. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये, वाढीव वीजबिलं भरु नयेत, असं आवाहनं देखील नांदगावकर यांनी केलं आहे.तत्पूर्वी वाढीव वीजबिल माफ करावं म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर पवारांना निवेदनही दिलं. त्यावेळी पवारांनी या संदर्भात राज्य सरकारशी चर्चा करतो म्हणून आश्वासनही दिलं. मात्र, त्यानंतरही काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही, असं आम्हाला वाटतंय, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.

बाळा नांदगावकर यांनी आज १९ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन वाढीव वीजबिला विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. राज्यातील जनतेला वाढीव बिलाचा शॉक बसल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांना भेटले, त्याशिवाय ऊर्जा सचिव, बीएमसी अधिकाऱ्यांना भेटले. अदाणी ग्रुपचे अधिकारी राज ठाकरेंना भेटले. राज ठाकरे स्वत: राज्यपालांना भेटले. राज्यपालांनी त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना भेटण्यास सांगितलं. त्यानंतर राज ठाकरे हे शरद पवारांशी बोलले. पवारांनी राज ठाकरेंकडून निवेदनं मागवली. आम्ही ही निवेदनं दिली. तरीही त्यावर निर्णय घेतला गेला नाही. आता तर वीजबिल माफ करणार नसल्याचं ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. आम्हाला विश्वास आहे, पवारसाहेबांचा… कारण राज ठाकरे बोलल्यानंतर पवारसाहेब म्हणाले होते, राज्य सरकारशी बोलतो. पण मला वाटतं पवारांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरलेली नाही, असं नांदगावकर म्हणाले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट