
औरंगाबाद जिल्ह्यातील वीजेचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ऊर्जा विभागाचा आढावा- ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांची ग्वाही
- by Adarsh Maharashtra
- Oct 27, 2020
- 957 views
मुंबई, दि. 27 : औरंगाबाद जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील आणि शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. उद्योग व शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठा होण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व महावितरणच्या सहसंचालकांनी संयुक्तपणे उपाययोजना करून कार्यअहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई आणि ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिल्या.औरंगाबाद जिल्ह्यातील वीजेच्या प्रश्नांवर पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील कृषीपंपाना अनियमित वीज पुरवठा, अनेक ठिकाणी रोहित्रे नादुरूस्त तसेच रोहित्रांसाठी ऑइलची कमतरता आदी समस्या यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधीनी मांडल्या. औरंगाबाद शहरातील 33 केव्ही उपकेंद्रांना अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी पडेगाव येथे 220 केव्ही वाहिनी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अंबादास दानवे यांनी केली. कन्नड विभागाचे विभाजन करून सिल्लोड विभागाची निर्मिती करणे आदी मागण्या यावेळी लोकप्रतिनिधींनी मांडल्या.
यावर डॉ. राऊत यांनी, जिल्हाधिकारी आणि ऊर्जा विभागाने शहराची भविष्यातील उद्योग, नागरी व शेतीसाठीच्या विजेची गरज लक्षात घेऊन आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंजुरी देण्यात येईल, असेही सांगितले. लवकरच कृषीपंप वीज जोडणी धोरणासाठी प्रयत्नशील असून त्यामुळे शेतकऱ्यांचे विजेच्या अनुषंगाने असलेले प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रब्बी हंगामात अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी आधीच घोषणा केली असून त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला आहे. रब्बी हंगामानंतर ऊर्जा विभागाची विजेची थकबाकी मिळाल्यास ऊर्जा विभागाला अधिक बळ मिळेल. जेणेकरून त्या त्या भागात ऊर्जा क्षेत्राशी निगडित कामे करता येतील, असेही डॉ. राऊत म्हणाले.
रोहित्रांना लागणारे ऑइल स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याबाबत तसेच अनेक उपकेंद्रांवरील वीजेचा दाब कमी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. या सर्व प्रश्नांवर जिल्हाधिकारी तसेच महावितरणच्या सहसंचालकांनी एकत्रित उपाययोजना करणारा अहवाल सादर करण्याच्या सूचना डॉ राऊत यांनी दिल्या.
जिल्ह्यातील विजेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला जाईल तसेच शेतकरी व उद्योजकांना दिलासा देण्याची ग्वाही यावेळी उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी दिली.खासदार भागवत कराड, आमदार सर्वश्री अंबादास दानवे, प्रशांत बंब, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, अतुल सावे यांच्यासह ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महावितरणचे सहसंचालक नरेश गिते, कार्यकारी अभियंता श्री. खंदारे आदी उपस्थित होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम