
मुलुंडच्या नेक्स्ट स्कूलवर युवासेनेची धाड! विद्यार्थ्यांना जबरदस्तीने शाळेत बोलावून वर्ग भरवले जात असल्याच्या तक्रारी
- by Adarsh Maharashtra
- Oct 14, 2020
- 1437 views
मुलुंड :(शेखर भोसले) मुलुंड पश्चिम येथील गवणी पाडा स्थित नेक्स्ट स्कूलमध्ये शासकीय आदेश धुडकावून गेल्या २ महिन्यांपासून जबरदस्तीने विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून वर्ग भरवले जात असल्याच्या तक्रारी काही पालकांमार्फत मुलुंड युवासेनेचे विभाग युवा अधिकारी अमित चव्हाण यांच्याकडे आल्या होत्या. आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने अमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड युवासेनेच्या काही कार्यकर्त्यांनी नेक्स्ट स्कूलला भेट देवून तपासणी केली असता तेथे विद्यार्थ्यांचे वर्ग भरलेले आढळून आले. याबाबत शाळेच्या व्यवस्थापनाकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. परंतु अनलॉकच्या काळात शासनाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याबद्दल तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याबद्दल व्यवस्थापनाला जाब विचारला असता व्यवस्थापनाने उडवाउडवीची उत्तरे दिली व वर्गातील विद्यार्थ्यांना मागच्या दरवाज्याने सोडून दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव मुलुंडमध्ये मोठया प्रमाणात असूनही शाळेच्या व्यवस्थापनाकडून शासकीय नियमांचे पालन न होता विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न चालू असल्याने शाळेच्या विरोधात शिक्षण विभाग, पालिकेच्या टी वार्डात तसेच मुलुंड पोलिस ठाण्यात रितसर तक्रार युवासेनेतर्फे करण्यात आली असून शाळेच्या व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाचा आदेश येईपर्यंत आपल्या पाल्यांना शाळेत पाठवू नये तसेच शाळा व्यवस्थापनाला तोपर्यंत ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यास भाग पाडावे, असे युवासेनेने यानिमित्ताने पालकांना देखील आवाहन केले आहे.
यासंदर्भात शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संवाद साधण्यास नकार दिला.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम