
एक खिडकी योजनेचे लवकरच विस्तारीकरण करणार- अमित देशमुख
- by Adarsh Maharashtra
- Oct 12, 2020
- 1301 views
मुंबई, दि.१२ : मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती, माहितीपट, वेबसिरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगी एक खिडकी योजनेतून दिल्या जातात. आता या योजनेचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत राबविल्या जाणाऱ्या एक खिडकी योजनेबाबतचे सादरीकरण आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, चित्रनगरीच्या सहव्यवस्थापकीय संचालिका आंचल गोयल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले की, आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी बरोबरच सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध जिल्हयांमध्ये विविध माध्यमांसाठी चित्रीकरण सुरु असते. अशा वेळी एक खिडकी योजनेचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. या योजनेच्या विस्तारी करणामुळे अधिकाधिक चित्रीकरण महाराष्ट्रात होऊ शकेल. येणाऱ्या काळात या योजनेचे विस्तारीकरण करतांना पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विस्तारीकरण करण्याबाबतचा विचार करण्यात यावा, याठिकाणी ही योजना अंमलात आणली गेल्यावर उर्वरित महाराष्ट्रातही एक खिडकी योजना राबविण्यात येईल.
राज्यात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते.त्यांच्या चित्रिकरणासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने उपलब्ध होण्यासह व्यवसाय सुलभतेसाठी चित्रिकरणासाठीच्या आवश्यक असणाऱ्या 30 हून अधिक परवानग्या एक खिडकी योजनेतून देण्यात येतात. या योजनेंतर्गत चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगी सात दिवसांच्या आत देण्यात येते. दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत या परवानगी ऑनलाईन पध्दतीने देण्यात येत असून निर्मात्यांना अटी शर्तीचे पालन करुन तसेच चित्रीकरणासाठी शुल्क भरुन परवानगी देण्यात येते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम