
बौद्ध समाजाच्या रिक्षाचालिका शीतल बनसोडे यांस जातीय विद्वेषातून जबर मारहाण : भिम आर्मी धावली घटनास्थळी.
- by Adarsh Maharashtra
- Oct 11, 2020
- 2289 views
मुंबई(प्रतिनिधी) जातीयतेच्या विखारी विद्वेषातून दीनदलितांच्या , गोरगरिबांच्या लेकीबाळींवर , माय बहिणींवर करण्यात येत असणारे हल्ले आम्ही कदापि सहन करू शकणार नाही , मुजोरांची मुजोरी आम्ही नष्ट केल्याशिवाय रहाणार नाही ,असा इशारा भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते अशोकभाऊ कांबळे यांनी आज कळवा हॉस्पिटलमध्ये शीतल बनसोडे ह्या पीडित महिलेस भेटण्यास आले असता दिला.आंबेडकरी आंदोलनाचा ज्वलंत बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील दिवा मुंब्रा येथील बौद्ध समाजाच्या शीतल बनसोडे ह्या रिक्षाचालक भगिनीवर जातीयतेच्या विखारी विद्वेषातून भ्याड हल्ला करून तिला गंभीररीत्या जखमी केले असून , तिच्या पाठीला , ओटीपोटाला गंभीर इजा झाली असून तिच्या जबड्यांना सुद्धा मार लागल्यामुळे तिला बोलण्यास आत्यंतिक वेदना होत असल्याकारणाने उपचारासाठी कळव्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.दिवा येथील एका चेतन बियर शॉपी नावाच्या दारूच्या दुकानात काम करणाऱ्या ४ ते ५ लोकांनी मिळून ह्या गरीब महिलेला जातीयवाचक शिवीगाळ करून ,तिला लज्जित करणारे अश्लील शब्द वापरून तिला बेदम मारहाण केली.
सदरहू घटनेची वार्ता कळताच भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांच्या सूचनेनुसार दिवा शहरप्रमुख प्रितेश पवार ताबडतोब घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी व वरिष्ठ समाजसेवक अमोल केंद्रे यांनी पुढाकार घेऊन लगेच कळवा पोलीस स्टेशन गाठून त्या आरोपींवर गुन्हा नोंदविला.ह्या प्रकरणातील एक आरोपी पोलिसांनी जेरबंद केला असून अजून इतर आरोपी फरार आहेत.ह्या दुर्दैवी घटनेवर प्रतिक्रिया देताना भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी काय गुन्हा होता आमच्या ह्या बहिणीचा ? त्या बारच्या समोर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना आपल्या रिक्षातून इच्छितस्थळी घेऊन जाणे हा गुन्हा असू शकतो काय ? काबाडकष्ट करून पोट भरणे हा गुन्हा असू शकतो काय ? रिक्षावर अशोकचक्रांकित निळा झेंडा लावणे हा गुन्हा असू शकतो काय ? निव्वळ जयभीमवाली असणे हा गुन्हा असू शकतो काय ? असे अनेक प्रकारचे प्रश्न विचारून ह्या आरोपींना जबर शिक्षा ठोठावून त्या बियर शॉपीचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा अशीही मागणी भिम आर्मीच्या वतीने त्यांनी केली आहे.
संविधान रक्षक भाई चंद्रशेखर आझाद आणि भिम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंह यांच्या आदेशानुसार सदरहू पीडिता शीतल बनसोडे यांना भेटण्यासाठी भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते अशोकभाऊ कांबळे हे थेट हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांनी ह्या बियर शॉपीच्या गुंडांच्या मुजोरीविरोधात कडक कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रभर उग्र आंदोलन छेडण्याचा जाहीर इशारा दिला आहे.ह्यावेळी वरिष्ठ समाजसेवक अमोलजी केंद्रे आणि भिम आर्मीचे दिवा शहरप्रमुख प्रितेश पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.मंगळवारी सर्व पक्षीय संघटनांच्या वतीने SP साहेबांना एक निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम