महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे विद्यालय मार्ग परिसरातील नागरिकांचे जीव धोक्यात

मुलुंड :(शेखर भोसले) मुलुंड पूर्व येथील विद्यालय मार्गावर असलेले तुंगवतेश्वर मंदिर व संभाजी राजे मैदान यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरणने थ्री फेज विद्युत केबल्स टाकताना भूमिगत केबल टाकण्याचा खर्च वाचविण्यासाठी तुंगवतेश्वर मंदिराच्या बाजूलाच असलेल्या आत्माराम दर्शन या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डोक्यावरून हवेमध्ये तरंगत केबल्स

टाकून सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवत आपल्या भोंगळ कारभाराचे दर्शन देखील घडविले आहे. अश्या प्रकारे उन्नत प्रवाही थ्री फेज विद्युत केबल्स टाकून महावितरणने आत्माराम दर्शन या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या अडचणीत वाढ़ केली आहेच त्याशिवाय रस्त्यावरून जाणारे पादचारी, जेष्ठ नागरिक, शाळकरी मुले यांच्या जीवाला धोका देखील निर्माण केला आहे.  

काही काळापूर्वी विद्यालय मार्गावरील संभाजी राजे मैदान व तुंगवतेश्वर मंदिराला विद्युत पुरवठा करण्यासाठी थ्री फेज विद्युत केबल टाकली. विद्युत उपकरण सुरक्षा नियमानुसार कोणतीही विद्युत केबल उघड्यावर न टाकता पालिकेची परवानगी घेवून जमिनीच्या आत चर खोदून योग्य पद्धतीने टाकली जाते परंतु मुलुंड विभागातील महावितरणमध्ये कार्यरत अभियंत्यांनी या सर्व सुरक्षा नियमांना फाट्यावर मारून उंचावर हवेत तरंगत असुरक्षितपणे सदर केबल आत्माराम दर्शन या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरून टाकल्या. या केबल्स जर अनावधाने किंवा नैसर्गिक रित्या कापल्या गेल्या किंवा तुटल्या तर त्यातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे, बाजूलाच असलेल्या गजबजलेल्या रस्त्या वरून जाणाऱ्या नागरिकांना, वाहनचालकांना विजेचा शॉक बसून मोठा अपघात होऊ शकतो व कदाचित त्यात जीव देखील जावू शकतो. आत्माराम दर्शन या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना देखील या उन्नत केबलमुळे धोका असल्याने या इमारतीतील रहिवाशांनी अनेकदा महावितरणच्या कार्यालयात तक्रारी केल्या तसेच २ महिन्यां पूर्वी महावितरणचे सहा.अभियंता खैरे यांना सांगून ही उन्नत केबल काढून भूमिगत टाकावी अशी विनंती केली. परंतु महावितरणने अद्याप याबाबत काहीच कारवाई केली नसल्याचे या इमारतीतील रहिवासी उद्धव दराडे यांनी सांगितले असून महावितरण एखादा मोठा अपघात किंवा कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे कां?  रस्त्यावरून जाणाऱया पादचाऱयांच्या, समोरील मराठी विद्यालयातील लहान मुलांच्या, संभाजी पार्क मध्ये फेरफटका मारण्यासाठी येणार्या जेष्ठ नागरिकांच्या जीवाशी का खेळत आहे? असे प्रश्न उद्धव दराडे आणि परिसरातील रहिवाशांनी संतप्त स्वरात यानिमित्ताने विचारले आहेत. 

मुलुंड महावितरणचे सहा. अभियंता खैरे यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, उन्नत केबल टाकणे हे चुकीचे असून भूमिगत केबल टाकण्यासाठी २० हजार रुपये प्रत्येक मिटरला पालिकेला द्यावे लागतात, तसेच त्यासाठी पालिकेची व स्थानिक नगरसेवकाची परवानगी घ्यावी लागते, हे टाळण्यासाठी कदाचित तेव्हाच्या अभियंत्याने ही हवेत तरंगती केबल टाकली असावी, तरीही याबाबतीत मी माझे वरिष्ठ अधिकारी सरोदे यांच्याशी बोलतो व काय करता येईल ते पाहतो, असे खैरे यांनी सांगितले.

परंतु आवश्यक त्या परवानग्या घेवून सुरक्षित पणे विद्युत केबल टाकणे हे महावितरणच्या कामाचा भाग असूनही त्यापासून पळ काढून कुठेतरी शॉर्टकट मारण्याचे व नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम महावितरण करीत असल्याचे दिसत असून हवेत तरंगती केबल टाकून आपल्या अज्ञानाचे दर्शनच महावितरणचे अधिकारी घडवीत असल्याचे एकंदरच चित्र दिसत आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट