
निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वितरीत करणाऱ्या,दुकानदारांविरुध्द कडक कारवाई- छगन भुजबळ
- by Adarsh Maharashtra
- Sep 21, 2020
- 1566 views
मुंबई, दि. 21 : मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरीत करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना सुद्धा काही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारींची दखल अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगन भुजबळ यांनी घेऊन यासंदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्याअनुषंगाने दक्षता पथकामार्फत या दुकानाची अन्नधान्याच्या दर्जाबाबतची तसेच इतर बाबींची संपूर्ण तपासणी केली असता आढळुन आलेल्या त्रुटींसंदर्भात जीवनावश्यक वस्तु कायदा, 1955 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
"अधिकृत शिधावाटप दुकान क्र .27/ग/189 (गोरेगाव) या दुकानाची अनुक्रमे दि. 7 सप्टेंबर व दि.16 सप्टेंबर रोजी संपूर्ण तपासणी घेतली असता एकुण 54 किलो तांदूळ आणि 61 किलो गहू कमी आढळून आला त्या अनुषंगाने संबंधित दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना वितरीत केलेले अन्नधान्य शासनमान्य दर आणि परिमाणानुसार वितरित केले आहे किंवा कसे? याची खातरजमा करण्याकरीता दुकानास संलग्न असलेल्या शिधापत्रिका धारकाच्या गृहभेटी देऊन पडताळणी केली असता अनुक्रमे 370 किलो तांदूळ, 525 किलो गहू कमी वितरित केल्याचे आढळून आले. अशा प्रकारे अधिकृत शिधावाटप दुकानदाराने एकुण 424 किलो तांदूळ आणि 586 किलो गहू अशा एकुण रु.31,530.72 इतक्या रकमेच्या अन्नधान्याचा अपहार केल्याने अधिकृत शिधावाटप दुकानदारा विरुध्द बांगूरनगर पोलिस ठाणे, गोरेगाव, मुंबई येथे 36/2020 दिनांक 18.09.2020 रोजी गुन्हा नोंद केला असून दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले आहे तसेच या प्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावरही नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. "
कोणीही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वितरीत करण्याचा प्रयत्न करीत असल्यास कार्यालयाच्या हेल्पलाईन क्र.022-22852814 तसेच ई-मेल आयडी dycor.ho-mum@gov.in यावर संपर्क साधावा जेणेकरून अशा अधिकृत शिधावाटप दुकानदारांविरूध्द कारवाई करणे शक्य होईल, असे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यानी कळविले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम