यावर्षी येत्या २५ ऑगस्टला गौरींचं-महालक्ष्मींचं आगमन होणार आहे.जाणून घ्या कधी होणार शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

भाद्रपद महिना अनेक व्रत वैकल्य आणि सण घेऊन येतो. गौरी यालाच काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन म्हणतात हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे.भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचं घरोघरी आगमन होतं. प्रत्येक जण आपल्या कुळाचाराप्रमाणे गौरी ज्यांना अनेक ठिकाणी महालक्ष्मी पण म्हणतात, त्यांना आपल्या घरी बसवतात (स्थापन करतात), दुसऱ्या दिवशी त्यांचं मनोभावे पूजन करून त्यांना महानैवेद्य दाखवतात.तर तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर विसर्जन करतातगौरींचं किंवा महालक्ष्मीचं पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर केलं जातं म्हणून यांना ज्येष्ठागौरी पण म्हणतात.

जाणून घ्या यावर्षी कधी येणार गौरी आणि मुहूर्त

यावर्षी २५ऑगस्टला गौरींचं- महालक्ष्मींचं आगमन होणार आहे.तर २६ तारखेला पूजन असेल आणि २६ ऑगस्टला गौरींना निरोप दिला जाईल. दुपारी १ वाजून ५८ मिनीटां नंतर गौरींच्या आगमनाचा शुभ मुहूर्त आहे. तर प्रत्येकाच्या घरातील कुळाचारा प्रमाणे गौरी पूजन केलं जातं.तर गौरींच्या विसर्जनाचा मुहूर्त दुपारी १२ वाजून ३६ मिनीटांनंतर आहे.

     गौरी मांडण्याच्या विविध पद्धत

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतात गौरी पूजनाची वेगवेगळी पद्धत बघितली जाते. काही ठिकाणी गौरींचे नुसते मुखवटे असतात, तर काही कुटुंबांमध्ये पाणवठ्यावर जावून पाच, सात किंवा अकारा खडे आणून त्यांची पूजा केली जाते. त्याला खड्यांच्या गौरी म्हणतात.

काही भागांमध्ये पाच मडक्यांची उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे बसवतात आणि उतरंडीला साडी-चोळी नेसवून त्याची पूजा करतात.काही ठिकाणी राशीच्या महालक्ष्मी असतात. म्हणजेच घरातील गहू, तांदूळ याच्या राशी मांडून त्याची पूजा करतात.

तर विदर्भ, मराठवाड्यासह काही ठिकाणी सिमेंट, लोखंडी किंवा मातीच्या कोथळ्यांवर धड बसवून त्यावर महालक्ष्मींचे मुखवटे ठेवले जातात. तसंच एका कोथळी खाली गहू आणि दुसऱ्या कोथळीखाली तांदूळ ठेवले जातात. विदर्भात खास करून गौरीला महालक्ष्मी म्हणतात.

याशिवाय कुठे तेरड्याची गौर असते. यात तेरड्याची रोपं मुळासकट आणतात आणि मुळं म्हणजेच गौरींची पावलं असं म्हटलं जातं.

गौरी पूजनाचे तीन दिवस पहिला दिवस गौरी-महालक्ष्मी आगमन

आपआपल्या कुळाचाराप्रमाणे घरात गौरींच्या मुखवट्यांचं आगमन होतं. वाजत गाजत ताटात, परातीत पूजा करून गौरींचे मुखवटे ठेवले जातात. ते घराबाहेर फिरवून आणले जातात. घरात औंक्षण करून गौरींचं स्वागत केलं जातं. त्यानंतर गौरींच्या मुखवट्यांची आणि लक्ष्मीच्या हातांची पूजा केली जाते. त्यानंतर गौरींना उभं करून त्यांना साडी-चोळी नेसवली जाते. सर्व दागदागिने घालून महालक्ष्म्यांना सजवलं जातं. गौरींसोबत त्यांची मुलं (एक मुलगा आणि एक मुलगीही) अनेक ठिकाणी मांडली जातात. त्यांना विदर्भासह काही ठिकाणी झोला-झोली असं म्हणतात.

दुसरा दिवस गौरी किंवा महालक्ष्मी पूजन

दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. सकाळी गौरींची-महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवला जातो. कुणाकडे संध्याकाळच्या मुहूर्तावर महालक्ष्मीची पूजा केली जाते. यावेळी पांढऱ्या दोऱ्याला १६-१६ वेळा गुंडाळून त्याला हळदीनं पिवळ करतात आणि हा दोरा यालाच तातू म्हणतात हा देवीला वाहिला जातो. विसर्जनाच्या दिवशी याच दोऱ्याला गाठी पाडल्या जातात. पूजनाच्या दिवशी पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. प्रत्येक प्रातांत नैवेद्य हा वेगवेगळा असतो. पण आंबील ही प्रत्येक ठिकाणी असते. यानंतर केळीच्या पानांवर नैवेद्य वाढला जातो. महालक्ष्मीला नैवेद्या दाखवून त्यांच्यानावानं सवाष्ण जेवू घालतात.

तिसरा दिवस गौरी-महालक्ष्मीचं विसर्जन

तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचं-महालक्ष्मींचं विसर्जन करतात. या दिवशी सकाळी कथली आंबीलचा नैवेद्य दाखवतात. विसर्जनाच्या मुहूर्तापूर्वी महालक्ष्मीला वाहिलेल्या तातूला १६-१६ गाठी पाडल्या जातात आणि घरातील सवाष्ण आपल्या घरात तो तातू बांधतात किंवा नदीत तो विसर्जित केला जातो.विसर्जनापूर्वी गौरीची/महालक्ष्मीची म्हणजेच ज्येष्ठेची कथा वाचली जाते आणि आरती करून गौरींना निरोप दिला जातो.तर अशाप्रकारे राज्यात गौरींची-महालक्ष्मींची पूजा केली जाते.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट