
मनसेनं केलेला गंभीर आरोप किशोरी पेडणेकरांनी फेटाळला, दिलं चोख उत्तर
- by Adarsh Maharashtra
- Aug 20, 2020
- 943 views
मुंबई, 20 ऑगस्ट : 'मुंबईत पालिकेनं कोविड सेंटर उभारली आहे. पण, सेंटरच्या कामाचं एक कंत्राट महापौर किशोरी पेडणेकर यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर यांना देण्यात आले आहे. कोणतीही पडताळणी न करता हे काम देण्यात आलं आहे', असा गंभीर आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला. यानंतर आता शिवसेना आणि मनसेतला वाद पुन्हा एकदा पेटला असल्याचं पाहायला मिळालं आहे. मनसेच्या या गंभीर आरोपावर किशोरी पेडणेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
'किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर मनसेने केलेले आरोप हे बिनबुडाचे, राजकीय आकसापोटी व द्वेष भावनेतून करण्यात आले आहे.' असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंआ आहे. त्या पुढे म्हणाल्या की, 'मनसेने आरोप केले म्हणून मी खुलासा करीत नसून मुंबईकर नागरिकांमध्ये महापौरांबद्दल गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठी स्पष्टीकरण देत असल्याचे' महापौर म्हणाल्या.
'किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये प्रशांत गवस हे संचालक असून माझा मुलगा सुद्धा सहसंचालक आहे. हे मी नाकारत नाही. परंतु त्यांच्या कंपनीला महापालिकेच्या कायदा व नियमाप्रमाणे काम मिळाले असून संबंधित तथाकथित यांना याबाबत काही आक्षेप असेल तर ते बृहन्मुंबई महानगर पालिकेकडे चौकशी करू शकतात.' अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, '2011 साली या कंपनीची स्थापना झाली असून या कंपनीने यापूर्वीही बृहन्मुंबई महानगर पालिकेची अनेक छोटी-मोठी कामे केली आहे. कोविडच्या काळात महानगर पालिकेकडे ज्यावेळी मनुष्यबळाची कमतरता होती, त्यावेळी "नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया" येथील कोविड सेंटरला मनुष्यबळ पुरविण्याचे काम केले आहे. माझा मुलगा प्रथम भारतीय नागरिक व सज्ञान असून त्याला त्याचा स्वतःचा व्यवसाय करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर त्याने काही चुकीचे काम केले असते तर मी त्याचाही निषेध केला असता. परंतु महापालिकेच्या नियमाप्रमाणे मिळालेल्या कंत्राटाप्रमाणे त्याने काम केले आहे.'
महापौरांचा मुलगा म्हणून जर आपण आरडाओरड करीत असाल तर ते चुकीचे असून याबद्दल मी तथाकथितांचा निषेध करते, असेही महापौर म्हणाल्या. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जर कंत्राट मिळाले असेल तर यांना पोटशूळ उठण्याचे कारण काय ? हे मुंबईकर नागरिकांना चांगले माहित आहे मुंबईकरांना वस्तुस्थिती समजणे गरजेचं असल्याने मी माझे स्पष्टीकरण देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम