बुलेट वर्ल्डने सुरु केले लेह-लदाखमध्ये स्वच्छ भारत अभियान

मुंबई ( केतन खेडेकर )गेल्या वर्षभराच्या प्लांनिंगनंतर शेवटी आमची बुलेटवर्ल्डची टीम वीस जणांना घेऊन लडाखला पोहचली.  बुलेट ही आमची स्पेशालिटी आहे त्यामुळे पूर्ण लडाख बुलेटवर फिरायचं हा आमचा प्लॅन होता.  पुढचे दहा दिवस आता फक्त या निसर्गाचा अनुभव घ्यायचा होता.  लडाख खरोखर एक स्वर्गच आहे.  मोकळे रस्ते,  बर्फाने अच्छादलेल्या मोठमोठ्या डोंगररांगा, निळं पाणी, थंड वातावरण सगळंच मनाला स्पर्शून जाणारं.  निसर्गाने वेगवेगळ्या रंगाची उधळण केलेली आहे असंच तिकडे कायम वाटत राहतं. तिथे बुलेटवर फिरण्याची मजा काही औरच होती.

इतक्या सगळ्या सुंदर वातावरणात एका गोष्टीने आमचं लक्ष वेधून घेतलं.  एका ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला आर्मीचे काही जवान आम्हाला प्लॅस्टिकच्या बाटल्या उचलताना दिसले.   त्यांच्याशी चर्चा केल्यावर आम्हाला समजलं की दरवर्षी येणारे टुरिस्ट कितीतरी प्लास्टिक या स्वर्गात इतरत्र फेकून जातात व हे यांना उचलावं लागतं.  आम्हाला ही परिस्थिती पाहून अत्यंत वाईट वाटलं.  मजा करण्यासाठी, स्वतःला रिलॅक्स ठेवण्यासाठी लोकांनी लडाखला यायचं, कचरा करायचा आणि जे जवान स्वतःच्या जीवाची बाजी लावून या देशाचं सीमेवर रक्षण करतात त्यांनी हा कचरा उचलायचा.  जसे जसे आम्ही पुढे जात होतो तसं तसं रस्त्याच्या दुतर्फा आम्हाला अशाच प्लॅस्टिकच्या बाटल्या दिसायला लागल्या व एकंदर चीड सुद्धा यायला लागली.  आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून निर्णय घेतला.  दररोज एक व्यक्ती साधारण दोन लिटर पाणी पितो म्हणजे एका व्यक्तीच्या दोन त्याप्रमाणे वीस व्यक्तींच्या चाळीस बाटल्या एका दिवसाला होणार होत्या.  तसा हा आकडा दहा दिवसात चारशेवर जाणार होता.  आम्ही ठरवलं की पाण्याची बाटली रिकामी झाली की बाहेर न फेकता ती स्वतःच्या बॅगेत ठेवायची.  रस्त्यातून जाताना प्रत्येकाला जितक्या जमतील तितक्या बाटल्या उचलायच्या व आमच्याकडे एक मोठी गाडी सोबत होती त्यामध्ये टाकायच्या.  दिवसाकाठी जमलेल्या जितक्या बाटल्या असतील त्या जिथे व्यवस्थित कचराकुंडी असेल तिथे टाकायच्या.  ठरल्याप्रमाणे पुढचे दहा दिवस आमच्या सगळ्या टीमने ही मोहीम जबाबदारीने हातात घेतली आणि तेवढे दिवस का होईना आपल्या जवानांच काम हलकं केलं.

तसं पाहायला ही एक साधी पण महत्वाची गोष्ट.  मुंबईमध्ये प्रवास करतानासुद्धा काही ना काही खाऊन झाल्यावर त्याचा कचरा बस, ट्रेन किंवा रस्त्यावर फेकताना किती सुशिक्षित अडाणी लोक आपण नेहमी बघतो.  आता बऱ्याच ठिकाणी स्टेशनला किंवा रस्त्यावर कचराकुंड्या आहेत पण लोकांना तितका वेळ आपल्यासोबत तो कचरा बाळगायला लाज वाटते.  फर्स्ट क्लास डब्ब्यात सूट बूट टाय मध्ये असलेल्या लोकांना सुद्धा खिडकीतून बाहेर प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकताना पाहिलं आहे.  त्यांना हटकलं की ते भांडायला ही तयार असतात.  आपला मूड का खराब करावा म्हणून अशावेळी शांत राहावं लागतं.  हेच लोक जेव्हा परदेशांत असतात तेव्हा तिकडचे नियम अगदी काटेकोरपणे पाळतात.  मुळात हे शिक्षण आपल्याकडे अगदी शाळेपासून दिलं गेलं आहे पण त्याची अमलबजावणी काटेकोरपणे केली जात नाही.  परदेशी अशा चुकांना शिक्षाच आशा मोठ्या असतात की माणूस चूक करायला धजावत नाही.  आत्ता नव्याने चालू झालेली "नो पार्किंग" मध्ये दहा हजार रुपयांचा फाईन हे त्याचंच एक उदाहरण.  आपल्या देशातल्या लोकांना हीच भाषा व्यवस्थित कळते.

आपण प्रत्येकाने फक्त एकच शपथ घेतली की प्रवासात असताना माझ्यामुळे होणारा कचरा मी माझ्या बॅगेत किंवा स्वतःजवळ बाळगेन व कचराकुंडीतच टाकेन, तरी आपल्या शहराच्या, राज्याच्या आणि परिणामी देशाच्या स्वच्छतेमध्ये खूप फरक पडेल व आपल्या देशाला जसं इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं होत तसं कचऱ्यापासून सुद्धा मिळेल व देश खऱ्या अर्थाने "सुजलाम सुफलाम" होईल.

आेंकार मधुकर भोवर.

संचालक- बुलेट वर्ल्ड

भ्रमणध्वनी क्र.- ८८५०१२३३९०

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट