
शालांत परीक्षेत ९८.८० टक्के गुण मिळवणाऱ्या भांडुपच्या अमर कौर विद्यालयच्या भाग्यश्री गावडे हिचा सत्कार.
- by Reporter
- Aug 13, 2020
- 1046 views
मुलुंड (शेखर भोसले) : अत्यंत गरीब परिस्थिती असतानाही मेहनतीने अभ्यास करून शालांत परीक्षेत ९८.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येणाऱ्या भांडुप पश्चिम येथील अमर कौर विद्यालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री गावडे हिचा ईशान्य मुंबई जिल्हा जनता दलाच्या वतीने सत्कार करण्यात आला असून तिला पुढील शिक्षणासाठी १५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. भाग्यश्री गावडे हिचे वडील एका सहकारी बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतात तर आई गृहिणी आहे. भांडुप पश्चिमेकडील दहा बाय दहा आकाराच्या झोपडीत हे कुटुंब राहते. परंतु, मुळातच हुशार असलेल्या भाग्यश्रीने नियोजनबद्ध अभ्यास करीत शालान्त परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे.
वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेऊन प्राध्यापक होण्याची भाग्यश्रीची मनिषा आहे. शालान्त परीक्षेतील तिची कामगिरी लक्षात घेऊन ईशान्य मुंबई जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष संजीवकुमार सदानंद यांच्या पुढाकाराने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि १५ हजार रुपये देऊन तिचा सत्कार करण्यात आला. पक्षाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वतः संजीवकुमार सदानंद, अशोक नाडर, शाळेचे संस्थापक आणि विद्यमान सरचिटणीस मा. ना. म्हात्रे, मुख्याध्यापक सुनिल वागळे आदी उपस्थित होते.
रिपोर्टर