कल्याण-डोंबिवली करांसाठी आठ तासाची नोकरी, पाच तासाचा प्रवास

डोंबिवली (श्रीराम कांदू) : कल्याण, डोंबिवलीतून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ये-जा करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या कल्याण-शीळ रस्त्यावर पडलेले खड्डे, वाढलेला वाहनांचा भार आणि सुरू असलेली विकासकामे आणी बंद लोकल सेवा, सार्वजनिक वाहतुकीची मर्यादित साधने, कार्यालये सुरू झाल्याने रस्त्यांवर वाढलेली वाहनांची गर्दी यामुळे सर्वसामान्यांसाठी नोकरीसाठीचा प्रवास वेळखाऊ होऊ लागला आहे. मात्र, कल्याण-डोंबिवलीकरांसाठी हा प्रवास म्हणजे एक दिव्यच ठरत आहे कल्याण-शीळ मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची व्यथा, खड्डे, वाहनांची गर्दी यामुळे वाहतूक कोंडी आठ तासाची नोकरी आणि पाच तासांचा प्रवास एकूण १३ तास वेळ जात
 
आठ तासांची नोकरी आणि पाच तासांचा प्रवास अशा वेळापत्रकामुळे कल्याण, डोंबिवलीकर वैतागले असून आता तरी लोकल सुरू करा, अशी मागणी तीव्र होऊ लागली आहे.वर्षभरापासून राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे कल्याण-शीळ मार्गाच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याची कामे आधुनिक तंत्रज्ञान वापरून वेगाने पूर्ण केली जात असल्याचा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वारंवार करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. या रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल वाहतूक बंद असल्याने कल्याण-डोंबिवलीतून मुंबई-ठाण्यातील कार्यालयात जाणारे कर्मचारी सध्या खासगी वाहनाने या रस्त्याचा वापर करून कार्यालय गाठत आहेत. त्यामुळे रोज सकाळ आणि सायंकाळच्या वेळी या रस्त्यावर वाहनांचा भार वाढला आहे. वर्षभरापासून सुरू असलेल्या कामामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी अरुंद झाला आहे. त्याचबरोबर कामासाठी काही ठिकाणी दुभाजक टाकण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी झालेल्या अर्धवट कामांमुळे हा रस्ता उंच सखल झाला आहे. त्यातच पावसामुळे या रस्त्यावर खूप खड्डे पडले असून रस्त्यावरील डांबरही वाहून गेले आहे. त्यामुळे टाळेबंदी शिथिल झाल्यापासून या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या वाहतूक कोंडीमुळे २० ते ३० मिनिटांच्या प्रवासासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या मार्गावर चार ते पाच तास या कोंडीत अडकून पडावे लागते.

रस्त्याचे काम आणि पावसामुळे पडलेले खड्डे यामुळे होत असलेली वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांवरही अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे या ठिकाणाची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती शीळ-डायघर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश लंबाते यांनी दिली. तसेच या मार्गावर विरोधी दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याचेही लंबाते यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट