
भाजपच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून सुशांत प्रकरणात आघाडी उघडली -संजय राऊत
- by Adarsh Maharashtra
- Aug 09, 2020
- 1133 views
मुंबई, ०९ ऑगस्ट :सुशांतच्या बिहार सरकार आणि केंद्र सरकारकडून राजकारण होत आहे. मुंबई पोलीस याबाबत सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकं रहस्य लपवण्यासाठी दबाव तंत्र वापरत आहेत. महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधण्या साठी प्रयत्न होत आहेत. आज सामनातून यावर प्रकाश टाकला आहे. या प्रकरणाचा राजकीय फायद्यासाठी वापर होत आहे. मुंबई पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर मग मतं मांडावे आणि टीका करावी, देशात लोकशाही आहे. कोणाचे हात कुठेपर्यंत पोहोचले आहे हे आम्हाला माहित आहे. असं ही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
४० दिवसांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल होते. सीबीआयकडे प्रकरण सोपवण्याची मागणी करत बिहारचे मुख्यमंत्री यात पडतात. हा घटनाक्रम पाहिल्यावर हे कोणीतरी लिहितंय असं वाटतं. मुंबई पोलिसांचं काम स्कॉटलंडच्या पोलिसांच्या तोडीचं आहे. त्यांना तपास करून घ्यायचा नाही, म्हणून हे कारस्थान सुरु आहे. पण जे घेराबंदी करत आहेत ते स्वतःच अडकतील. सीबीआयला क्वारंटाईन केलं जावं याबाबत काही माहिती नाही. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.दरम्यान, मीडिया ट्रायल मुळे नवंनवे प्रश्न निर्माण होत असून, या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपा, सीबीआय आणि मीडिया ट्रायलवर नाराजी व्यक्त करत फटकारलं आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केलेल्या भूमिकेचाही राऊत यांनी हवाला दिला आहे.
“महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. ते कसेही करून पाडायचे. पडत नाही म्हटल्यावर बदनाम करायचे असे विरोधकांनी ठरवले व भारतीय जनता पक्षाच्या सर्वच प्रकारच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून त्यांनी सुशांत प्रकरणात आघाडी उघडली. त्या वृत्तवाहिनीच्या प्रमुखाने केले ते ‘गॉसिपिंग!’ लोकांच्या मनातील संशय वाढवला. अर्णब गोस्वामी हे ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीचे प्रमुख. ते राजकीय नेत्यांचा, मुख्यमंत्र्यांचा सरळ एकेरी भाषेत उल्लेख करतात, बदनामी कारक भाषा वापरतात, धमक्या देतात. सोनिया गांधींच्या बाबतीत त्यांनी हेच केले व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून आव्हानाची भाषा करतानाही त्यांना लोकांनी पाहिले. हे सर्व पाहिल्यावर शरद पवार यांनी मला फोन केला, ‘एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते, तर संस्था असते.’ ‘Institute’ असा उल्लेख त्यांनी केला. शेवटी त्यांनी प्रश्न केला, ‘मग सरकार काय करते?’ पवार यांचे मत एका अनुभवी नेत्याचे मत आहे. पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही. एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. त्या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बळ देतात. सुशांतसिंह हे निमित्त व त्या निमित्ताने सरकार बदनाम करायचे हे मुख्य कारस्थान. ते सुरूच आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम