
वांद्रे स्टेशन गर्दी प्रकरण :एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी निर्दोष, पोलिसांचा कोर्टात अहवाल
- by Adarsh Maharashtra
- Aug 09, 2020
- 1359 views
मुंबई : लॉकडाऊन काळात वांद्रे रेल्वे स्थानकावरील गर्दी प्रकरणात एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना अटक करणं ही आपली चूक झाल्याचे पोलिसांनी मान्य केले आहे. या प्रकरणात राहुल कुलकर्णी यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे सकृतदर्शनी आढळून येत नसल्याने, त्यांना कलम 169 सीआरपीसी प्रमाणे सदर गुन्ह्यातून मुक्त करण्याची विनंती पोलिसांनी कोर्टाला केली आहे. तसेच सदर गुन्ह्याचे 'वस्तुस्थितीची चुक' या सदराखाली 'क' वर्गीकरण होण्याची देखील विनंती पोलिसांनी कोर्टाकडे केली आहे.
घटना काय घडली आणि गुन्हा कसा नोंदवला गेला
वांद्रे स्टेशनवर 14 एप्रिलला गर्दी जमा झाली होती.त्यावरून पोलिसांनी एकूण तीन गुन्हे दाखल केले होते. त्यात राहुल कुलकर्णी यांच्याविरोधात 117,188,269,505 (2) भादवि सह साथिचे रोग अधिनियम 1897 ही कलमे लावण्यात आली होती. या कलमां प्रमाणे 148 प्रमाणे नोटीस देणे आवश्यक होते. परंतु सर्व नियमांचा भंग करुन पोलिसांनी राहुल कुलकर्णी यांना 15 एप्रिलला पहाटे उस्मानाबाद येथील माझ्या घरून अटक केली. त्यानंतर नियमांप्रमाणे 90 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल होणे अवश्य होते. तसे आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले. ह्या 90 दिवसाच्या तपासात पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपास केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात राहुल कुलकर्णी यांचा संबंध नसल्याचे मान्य केले आहे.
काय म्हटले आहे पोलिसांच्या अहवालात
अहवालात म्हटलं आहे की, एबीपी माझावर प्रसारित झालेल्या वृत्तांचे स्क्रिनशॉट पंचनाम्यांतर्गत हस्तगत करण्यात आलेले आहेत. सदर वृत्तांकनाचा आशय पाहता त्यावरुन रेल्वे बोर्डाने परप्रांतियांना त्यांचे गावी पोहोचवण्यासाठी जनसाधारण रेल्वे गाड्या सुरु करण्याची योजना असल्याचे व तसा प्रस्ताव तयार असल्याचे वृत्तांकन केल्याचे दिसून येते. याशिवाय एका वृत्तांकना मध्ये संशयित पत्रकार नामे पत्रकार राहूल कुलकर्णी याने, 'देशभरामध्ये जनसाधारण नावाच्या अनारक्षित गाडया सुरु करण्याचा निर्णय झालेला आहे' असे वृत्तांकन केल्याचे दिसून येते. तथापी, नमूद जनसाधारण रेल्वे गाडया केव्हा सुरु होणार याचा कोणताही निश्चित उल्लेख सदर वृत्तांकनामध्ये करण्यात आलेला नसून प्रत्येक वृत्तांकनामध्ये नंतर तसा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे वृत्तांकन करण्यात आलेले आहे. या प्रकरणातील साक्षीदारांनी अनोळखी व्यक्ती, "बांद्रा रेल्वे स्टेशन जाना है, जल्दी चलो, न्यूज चैनल पे भी सरकार ने गाँव भेजने के लिये ट्रेन चालू करदी है, ऐसी न्यूज आयी है," असे बोलताना ऐकले असून, त्यांनी मात्र यातील पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी केलेले वार्तांकन प्रत्यक्ष ऐकलं किंवा पाहिले नसल्याचे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आढळून आलेले आहे.
पोलिसांच्या अहवालात म्हटलं आहे की, वास्तविक वांद्रा रेल्वे स्टेशन पश्चिम या ठिकाणाहून केवळ उपनगरीय रेल्वे प्रवासी गाड्या सुटत असून, परराज्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्या वांद्रे पूर्व येथील वांद्रे रेल्वे टर्मिनस या ठिकाणाहून सुटतात. त्यामुळे दिनांक 14 एप्रिल रोजी परप्रांतिय मजुराची गर्दी वांद्रे पूर्व येथील वांद्रे रेल्वे टर्मिनस या ठिकाणी होणे अपेक्षित होते. शिवाय, या गुन्ह्यातील संशयित पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी मात्र त्यांच्या वृत्तांकनामध्ये कुठेही वांद्रे रेल्वे स्थानकाचा किंवा अन्य कोणत्याही रेल्वे स्थानकाचा उल्लेख केलेला नाही. त्यावरुन कुलकर्णी यांनी केलेल्या वृत्तांकनाचा परप्रांतीय मजूर कामगारांनी विपर्यास करुन वांद्रे रेल्वे स्टेशन येथून ट्रेन सुरु होणार असल्याचा गैरसमज करुन घेतल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे वांद्रे रेल्वे स्टेशन पश्चिम परिसरात गर्दी करण्यासाठी परप्रांतीय कामगार मजूरांना कुलकर्णी यांनी चुकीचे वृत्तांकन करून चिथावणी दिल्याचे किंवा त्यांना प्रभावित केल्याचे मानण्यास कारण दिसून येत नाही. तसेच त्यांचा सदर घटनेत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे देखील सदर गुन्ह्याच्या तपासात आढळून आलेले नाही, असं अहवालात म्हटलं आहे.
दिग्गजांनीही म्हटलं होतं कुलकर्णींची अटक चूकच
राहुल कुलकर्णी यांना या प्रकरणात अटक झाल्यानंतर अनेक दिग्गजांनी ही अटक चूक असल्याचं त्याचवेळी म्हटलं होतं. एबीपी नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असून या प्रकरणात एबीपी माझा आणि राहुल कुलकर्णी यांची चूक नसल्याचे आणि पुराव्याआधारे बातमी प्रसारित केल्याचं म्हटलं होतं. तर पत्रकार रविश कुमार, संपादक गिरीश कुबेर, पत्रकार मिलिंद खांडेकर, ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत, पत्रकार विजय चोरमारे, पत्रकार अशोक वानखेडे यांच्यासह अनेक पत्रकारांनी सोशल माध्यमांवर राहुल कुलकर्णींचं समर्थन केलं होतं. तर राजकीय क्षेत्रातून देखील अनेक नेत्यांनी कुलकर्णी यांची अटक चूक झाल्याचं म्हटलं होतं. सामनाचे संपादक तथा खासदार संजय राऊत, राजू शेट्टी, अंजली दमानिया यांच्यासह कवी सौमित्र, विश्वंभर चौधरी, अविनाश धर्माधिकारी, पराग करंदीकर यांनी देखील ही अटक चूक असल्याचं म्हटलं होतं. तसंच राज्यातील अनेक पत्रकार संघांनी देखील राहुल कुलकर्णी यांची अटक चूक असल्याचे म्हणत निषेध केला होता.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम