
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूशखबर,रेल्वे सोडणार विशेष गाड्या
- by Adarsh Maharashtra
- Aug 08, 2020
- 1654 views
डोंबिवली :(श्रीराम कांदू) गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. मनसे नेते तथा आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी पत्रव्यवहार करत तसेच ट्विट करत कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी योग्य ती खबरदारी घेऊन रेल्वे सेवा सुरू करून दिलासा द्यावा, ही मागणी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मान्य केली असल्याने कोकणवासीयांच्या सोयीकरिता गणेशोत्सवा साठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.
या संदर्भात 26 जुलै रोजी कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद तथा राजू पाटील यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र ट्विट केले होते. कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी योग्य ती खबरदारी घेऊन रेल्वे सेवा सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली होती. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात पारंपारीक पद्धतीने साजरा केला जातो. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे जिल्ह्यातून लाखो कोकणवासी गणेशोत्सवा निमित्त आपल्या मूळ गावी जाऊन उत्साहात सण साजरा करतात. दरवर्षी रेल्वे व राज्य परिवहन सेवा सुरू असल्याने त्यांना गावी जाण्यासाठी कोणतीही अडचण येत नव्हती. यावर्षी कोरोना विषाणूचे संकट देशासह राज्यावर आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातही लॉकडाऊन सुरू असून जवळ जवळ चार महिन्यांपासून कंपन्या, व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. यामध्ये बहुतांश जणांचा रोजगार बुडाला असल्याने सर्वांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यातच चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने अव्वाच्या सव्वा खाजगी ट्रॅव्हलला भाडे देऊन गावी जावे लागत आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील नोकरदार हतबल झाला आहे. वास्तविक महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यातील नागरिकांना सोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने श्रमिकसह इतर रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कोकणासह संपूर्ण राज्यातील चाकरमान्यांसाठी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी आमदार पाटील यांच्यासह अनेक संघटनांनी केली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असले तरीही किमान गणेशोत्सवासाठी तरी कोकणातील चाकरमान्यांना रेल्वेसेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी लावून धरली होती. आता ही मागणी मान्य झाली असून कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी रेल्वेने गावी जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम