
डोंबिवली-कोपर-दिवा दरम्यान तिघांचा मृत्यू
- by Adarsh Maharashtra
- Aug 08, 2020
- 1175 views
डोंबिवली :(श्रीराम कांदू) रेल्वे रुळ ओलांडण्याच्या नादात तिघा जणांचा वेगवेगळ्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडल्या आहेत. या अपघातांच्या नोंदी डोंबिवलीच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस यामुळे रेल्वे रेल्वे गाड्यांचा अंदाज न आल्याने तिघांना आपला जीव गमवावा लागल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश पवार यांनी दिलेल्या माहितीनूसार हे तीनही अपघात डोंबिवली-कोपर-दिवा दरम्यान गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री लोहमार्ग पोलीसांना सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटना स्थळांचा पंचनामा करून हे तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता केडीएमसीच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलकडे पाठवून दिले. या प्रकरणी अपघाती अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांमधून प्लॅटफॉर्म क्र. 5 च्या दिशेने एकजण येत असताना रेल्वेखाली चिरडून ठार झाला. सद्या सिग्नल फ्री असल्याने मालगाड्यांची वाहतूक भरधाव वेगाने होत असते. त्यातील एखाद्या गाडी खाली आल्याने ठार झालेल्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न असल्याने ओळख पटविणे कठीण जात आहे. तर अन्य दोघे कोपर-दिवा मार्गावर रुळ ओलांडत असतानाच तेही अशाच एखाद्या गाडीखाली येऊन ठार झाले. सदर दोघे दिव्यात राहणारे मजूर असावेत, असे त्यांच्या पेहराव्यावरून दिसून येते. या तिघांची ओळख अद्याप पटली नसली तरी त्यांच्या वारसांचा तपास सुरु असून सद्या बेवारस नोंद असल्याचे वपोनि सतीश पवार यांनी सांगितले. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटे उशिरापर्यंत पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत होता. त्यात रुळ ओलांडताना गाड्यांच्या वेगाचा अंदाज न आल्याने हे अपघात घडले असावेत, असा प्राथमिक अंदाज वपोनि पवार यांनी व्यक्त केला. या संदर्भात दिवा, मुंब्रा, रामनगर, विष्णूनगर, टिळकनगर व मानपाडा पोलिसांनाही कळविण्यात आल्याचे ते म्हणाले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम