फिजिकल डिस्टनसिंगचा उडतोय कल्याण-डोंबिवलीत असाही फज्जा,शहर-ग्रामीण पट्ट्यातील बार-ढाबे-हॉटेल्स बिनबोभाट सुरू

डोंबिवली :(श्रीराम कांदू)  कोरोनाच्या शिरकावामुळे 24 मार्चपासून लॉकडाऊन घेतल्यानंतर कल्याण-डोंबिवलीतील जवळपास 250 बार अँड रेस्टॉरंटना फटका बसला आहे. मात्र लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल होताच  कल्याण-डोंबिवलीतील हॉटेल, बार आणि अवैध धाब्यांवर मद्यपी व खवय्यांचा राबता सुरू झाला आहे. एकीकडे फिजिकल डिस्टनसिंगचे सर्व नियम फाट्यावर मारून या मंडळींनी आपापले गोरख धंदे रात्री 8 नंतर बिनबोभाट सुरू केले आहेत. तर दुसरीकडे पोलिस आणि दारूबंदी खात्याच्या कानाडोळ्यावर सोशल मीडियावर टिकेची झोड घेतली जात आहे.

कल्याण-शिळ मार्गावर साधारणत: 50 बार आहेत. कल्याण-मुरबाड रोड व आग्रा रोड अशा दोन महामार्गांवर एकूण 100 बार आहेत. लॉकडाऊन घेतल्यानंतर बार, हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंग्ज, छोट्या-मोठ्या खानावळ्या बंद करण्यात आल्या. महामार्गावरील बार बंदी केल्यानंतर त्याचा फटका या 150 बारना बसला आहे. त्यांचे दिवसाला जवळपास हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तसेच हे बार बंद केल्यापासून बेरोजगारीतही वाढ झाली आहे. एका बारमध्ये किमान 15 ते 20 वेटर कार्यरत असतात. तर काही मोठ्या बारमध्ये एक ते दोन मॅनेजर कार्यरत असतात. एका बारमधील 22 कर्मचारी याप्रमाणे 3 हजार 300 वेटर्सवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. एकीकडे बेकारीमुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे चार महिने स्वस्थ बसलेल्या काही हॉटेल, बार आणि अवैध धाबेवाल्यांनी आपले गोरख धंदे खुलेआम सुरू केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. टेबलांवर ओल्या पार्ट्या झोडणाऱ्यांकडून फिजिकल डिस्टनसिंगचे सर्व नियम फाट्यावर मारले जात आहेत.
संपूर्ण देशात बार रेस्टॉरंट आणि हॉटेल्सवर बंदी असताना कल्याण-डोंबिवलीसह कल्याण-शिळ आणि बदलापूर पाईपलाईन रोडला रात्री 8 नंतर छुप्या मार्गाने सर्व ढाबे, बार आणि रेस्टॉरंट चालू असल्याचे दिसून येत आहे. राज्य उत्पादन शुल्क यावर कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही. चोरीछुपे धंदे करणाऱ्या ढाबे, बार, हॉटेलवाल्यांना एका प्रकारचे पाठबळ दिल्याचे येथील प्रशासना कडून दिसून येत आहे. कल्याण-डोंबिवली दिवसेंदिवस करोनाचे पेशंट वाढत असताना प्रशासनाला मात्र आपल्या आपल्या खिसे भरण्यापासून वेळ मिळत नाही. सर्व प्रकारच्या दोन नंबरच्या धंद्यांमध्ये पान, गुटखा, दारू, गांजा, अशा वस्तू अवैधरित्या मिळू लागल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी कल्याण-डोंबिवलीत बिनधास्तपणे चालू आहे. सर्वसामान्य व्यावसायिक, सामान्य व्यापारी जे कायदेशीरपणे धंदा करत आहेत त्यांना मात्र कायद्याचा बडगा दाखवला जात असल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

...तर लायसन्स/परमिट रद्दची कारवाई होणार 

या गंभीर प्रश्नाकडे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे निरीक्षक अनिल पवार यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, मुळात लॉकडाऊन काळात परमिट रूममध्ये मद्यपान आणि जेवणाला बंदी घालण्यात आली आहे. काऊंटर सेल वा पार्सल डिलिव्हरीला मुभा देण्यात आली आहे. 6 पोलिस ठाण्याच्या या हद्दीतील 140 पैकी 95 परमिटवाल्यांनी पैसे भरून नूतनीकरण केले आहे. ज्या 17 - 18 परमिटधारकांनी नूतनीकरण केले नाही त्यांना परमिट रूम सुरू करता येणार नाही. लॉकडाऊन काळात तर ते हिम्मतच करणार नाहीत. मात्र तरीही कुणी चोरून परमिटची हॉटेल्स सुरू ठेवत असतील तर त्यांच्यावर लायसन्स/परमिट रद्दची कारवाई होऊ शकते. तथापी धाब्यांवर रात्रीनंतर मद्यपान केले जात असण्याची शक्यता निरीक्षक पवार यांनी मान्य केली. मात्र तक्रार वा माहिती जरी मिळाली तरी अशांवर आम्ही तात्काळ कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट