
मृतदेहाविनाच चिता पेटवण्याची वेळ
- by Adarsh Maharashtra
- Jul 30, 2020
- 2015 views
शिरोळ :मृतदेहाविनाच चिता पेटवण्याची वेळ नातेवाईक आणि ग्रामस्थांवर आली. शिरोळ तालुक्यातील शिरटी येथे हा प्रकार पुढे आला आहे. तीस ते पस्तीस वर्षे वयाच्या तरुणाला अस्वस्थ वाटू लागल्याने सांगलीतील एका नामांकित रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
शिरटीतील तरुणाला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच रुग्णालयात तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयाचे बिल भरून मृतदेह ताब्यात घेण्यास प्रशासनाने सांगितले. त्यानुसार नातेवाईकांनी बिल भरले आणि प्रेत ताब्यात देण्याची मागणी केली. यावेळी रुग्णालयाच्या व्यवस्थापकाने रुग्णाचा स्वॅब घेतला असून रिपोर्ट आल्यानंतरच मृतदेह ताब्यात दिला जाणार असल्याचे सांगितले.
तत्पूर्वीच तरुणाच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचली होती. तसेच मृतदेह लवकरच ताब्यात मिळणार असून अंत्यविधीची तयारी करण्यास सांगितले. त्यानुसार गावात नातेवाईक आणि गावकऱ्यांनी अंत्यविधीची तयारी करून सर्व साहित्य स्मशानभूमीत गोळा केले.
परंतु, संबंधित मृताचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगत मृतदेहावर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केल्याची बातमी गावकऱ्यांना समजली. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळालाच नाही. त्यामुळे गावाकडे रचलेल्या चितेला मृतदेहाविनाच अग्नी द्यावा लागला. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम