
देशाचं नेतृत्व करण्याची आपल्यात क्षमता आहे,संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा!
- by Adarsh Maharashtra
- Jul 27, 2020
- 1850 views
मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. ये दोस्ती…. हम नही तोडेंगे, असं म्हणत संजय राऊत यांनी वाढदिवसाला उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.
ये दोस्ती…. हम नही तोडेंगे… आपण आमच्या आयुष्यात खास आहात… आपणास वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे., असं ट्विट करत संजय राऊत यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नुकतीच सामनासाठी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत देखील संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना अगदी जागतिक आरोग्य संघटनेला देखील आपण मार्गदर्शन करताय की काय? असा समज लोकांचा झालेला आहे, असं म्हटलं. एकंदरित मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा कारभार हाती घेऊन सहा महिने झालेत असं असताना देखील खूप वर्ष राज्य चालवण्याचा अनुभव गाठीशी आहे, असे गौरवोद्गार संजय राऊत यांनी काढले.
सामनामधून मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने-
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज साठाव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. वाढत्या वयाबरोबर शहाणपण येते असे म्हणतात. ते पूर्ण सत्य नाही. ते शहाणे होतेच. वय हे फक्त निमित्त ठरले. मुख्यमंत्री ठाकरे यांची एक प्रदीर्घ मुलाखत ‘सामना’त दोन भागांत प्रसिद्ध झाली. अत्यंत संयमाने आपली मते मांडूनही ही मुलाखत वादळी ठरली यातच उद्धव यांचा स्वभावविशेष दिसून येतो. आम्ही उद्धव ठाकरे यांना अनेक वर्षे ओळखतो.”
“त्यांच्या स्वभावाचे, कार्यपद्धतीचे अनेक कंगोरे आम्हाला माहीत आहेत. मोठय़ा पदावर विराजमान झाला म्हणून फालतू बडेजाव मिरवणाऱ्यांपैकी हा माणूस नाही याची आता महाराष्ट्राला खात्री पटली असेल. संकटकाळात त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व स्वीकारले, पण त्यांचा स्वभाव संयमी वगैरे असला तरी ‘युद्धप्रसंगी’ खंबीर, राजकीय पराभवात बेदरकार, विजयात उदार आणि शांततेत स्नेहभाव असा साधारण खाक्या आहे.”
“उद्धव ठाकरे यांनी राजकारणात तडफदार युवानेते म्हणून प्रवेश केला व आज ‘साठी’ होत असताना त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम सुरू केले. याचा अर्थ असा की, ठाकरे यांना राजकारणात प्रवेश केल्यावर सतत संघर्ष करावा लागला, चढ-उतार पाहावे लागले, अपमान आणि टीका सहन करावी लागली. ‘सामना’तील मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणतात ते खरेच आहे. ते सांगतात, ”मला वाटतं, जगात माझंच असं एकमेव उदाहरण असेल की, ज्याची कुवत सगळ्यात कमी लेखली गेली, तोच पक्षाचा सर्वोच्च नेता झाला आणि याची कुवत नाही, याला काही कळत नाही असं अनेक जण बोलायचे, पण तोच राज्याचा मुख्यमंत्री झाला!”
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम