मुलुंडमधील महावितरणचे सबस्टेशन तळीरामांचा व गर्दुल्ल्यांचा अड्डा! चालतात अवैध धंदे!

मुलुंड: (शेखर चंद्रकांत भोसलेमुलुंड पूर्वेकडील टाटा कॉलनीत असलेल्या महावितरणच्या सबस्टेशनचा ताबा तळीरामांनी व गर्दुल्य्यांनी घेतला असून रोज तेथे दारूच्या पार्ट्या व अवैध धंदे चालत असल्याचे आढळून आले आहे. येथे दारूच्या बाटल्यांचा मोठा खच पडलेला दिसत असून दारू रिचविण्यासाठी खालेल्ले कुजलेले अन्नपदार्थ, चकण्याचे कागद, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, वापरलेल्या पेपर डिश, सिगारेट व माचीसच्या काड्या, इत्यादींचा कचरा तेथेच टाकण्यात आल्या असल्याने संपूर्ण परिसर अस्वच्छ झाल्याचे आढळून आले आहे. परिणामी या सबस्टेशन परिसरात दुर्गंधी पसरली असून कूजलेला, कुबट वास सर्वत्र येत आहे तसेच अस्वच्छते मुळे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.


टाटा कॉलनीत इमारत क्र 12 च्या समोर पूर्वरंग इमारतीच्या लगत महावितरणचे प्रवाहित सबस्टेशन आहे. येथे असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मर मधून संपूर्ण टाटा कॉलनीला विद्युत पुरवठा होतो. महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जी कारभारामुळे या सबस्टेशनचा लोखंडी दरवाजा सतत उघडा असतो. सबस्टेशन देखरेखीसाठी महावितरणचे कर्मचारी येथे कधीच फिरकत नसल्यामुळे तळीरामांचे व गर्दुल्ल्यांचे आयतेच फावलें असून त्यांचा वावर येथे वाढला आहे. गर्दूल्ले व तळीराम या सबस्टेशनचा वापर दारू पिण्यासाठी करत असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना व विशेषतः महिला वर्गांना येथून जा-ये करताना असुरक्षितता निर्माण झाली आहे. दारू पिवून झाल्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्या, खाल्लेल्या चकण्याचे रिकामे कागद, कागदी पिशव्या, पेपर डिश, पाण्याच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटचे थोटके, जळालेल्या माचीसच्या काड्या इत्यादी ज्वलनशील वस्तूही तेथेच टाकल्या जात असल्यामुळे चुकून एखादी जळती माचीसची काडी किंवा जळती सिगरेट तेथे पडली तर सबस्टेशनमध्ये आग लागून मोठा स्फोट होवून संपूर्ण परिसराची मोठी हानी होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. बेजबाबदार महावितरणच्या अधिकाऱ्यांना या सबस्टेशनच्या सुरक्षेची कोणतीही काळजी नसल्यामुळे भविष्यात येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. 

दारूच्या बाटल्यांचा खच आत जमा झाला असल्यामुळे हे सब स्टेशन आहे की रेस्टॉरंट अँड बार असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला असून महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी बिलकुल लक्ष देत नसल्यामुळे तसेच पोलिस देखील या तळीरामांवर व गर्दुल्ल्यांवर कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे येथे राजरोसपणे दारूच्या पार्ट्या आणि अवैध कामे चालत आहेत. तसेच काहीवेळा काही कपल्स देखील सबस्टेशनमध्ये जावून अश्च्लील चाळे करत असतात त्यामुळे भविष्यात येथे अनैतिक घटना घडू शकते. स्थानिक नागरिकांना विशेषतः महिला वर्गांना येथून वावरताना असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे नवघर पोलिसांनी तातडीने लक्ष घालून येथे अवैध धंदे करणाऱ्यांवर, तळीरामांवर कारवाई करावी तसेच झोपलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जागे होवून आपली जबाबदारी ओळखून सबस्टेशनच्या सुरक्षेसाठी योग्य ती पाऊले उचलावीत अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

या सबस्टेशनची जबाबदारी असलेले महावितरणचे सहाय्यक अभियंता धात्रोक यांनी यासंदर्भात सांगितले की, महावितरण चोवीस तास लक्ष देवू शकत नाही त्यामुळे आमच्या नकळत जर काही तेथे होत असेल तर आम्ही काहीच करू शकत नाही असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला व उद्धटपणे फोन कट केला. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट