
महावितरणकडून या महिन्यातही मुलुंडकरांना अव्वाच्या सव्वा विजेचे बिल
- by Adarsh Maharashtra
- Jul 25, 2020
- 1949 views
मुलुंड:(शेखर चंद्रकांत भोसले) महावितरण कडून या महिन्यात देखील अव्वाच्या सव्वा विजेचे बिल आल्याने मुलुंडकरांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला असून अनेक वीज ग्राहकांनी यासंबंधीच्या तक्रारी पुन्हा एकदा मुलुंड पश्चिम येथील महावितरणच्या कार्यालयात केल्या आहेत तर काही ग्राहकांनी थेट ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. वीज ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची दखल ऊर्जा मंत्री यांनी घेतली असून ज्यांना वाढीव विजेचे बिल आले असेल अश्या ग्राहकांचे मीटर तपासून बिल कमी केले जाईल असे आश्वासन दिले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने विजेचे वाढीव बिल आल्याने हैराण झालेल्या मुलुंडकरांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटून तक्रारींचा पाऊस पाडला परंतु अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरांनी समाधान न झालेल्या ग्राहकांनी यासंदर्भात दाद मागण्यासाठी निरनिराळ्या पक्षांची कार्यालये व राजकिय पदाधिकाऱ्यांना भेटून आपल्या तक्रारी मांडल्या. परंतु कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने तसेच यातून काहीच तोडगा न निघाल्याने काही ग्राहकांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना गार्हाणे टाकले. ऊर्जामंत्रांनी वीज ग्राहकांना आलेल्या वाढीव बिला संबंधीच्या समस्या दूर करण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न चालू असून लवकरच यावर तोडगा निघेल असे आश्वासन दिले आहे. मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी देखील या प्रश्नात लक्ष घातले असून मुलुंडकरांना आलेल्या वाढीव बिलाची समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी कंबर कसली आहे.
लॉकडाऊनच्या काळात दुकाने, कारखाने, कार्यालये बंद आहेत तसेच घरगुती वीज वापर देखील कमी आहे, तरीही महावितरण अव्वाच्या सव्वा विजेचे बिल पाठवून ग्राहकांचा लुबाडत असल्याने हैराण झालेले वीज ग्राहक महावितरणच्या विरोधात उतरले असून संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
'मी व माझी पत्नी असे आम्ही दोघेच म्हातारे मुलुंड येथे राहत असून आमचा विजेचा वापर टी वी, फ्रीज, लाइट व पंखा सोडला तर काहीही नाही. ना आम्ही ए सी वापरत ना कंप्यूटर त्यामुळे लॉकडाऊनच्या आधी प्रत्येक महिन्याला 500 ते 600 रुपये आमचे विजेचे बिल यायचे परंतु मला गेल्या दोन महिन्यापासून वाढीव बिल येत असून गेल्या महिन्यात रुपये 2000 तर या महिन्यात रुपये 3500 बिल आले आहे. आमचा विजेचा वापर जास्त नसतानाही गेल्या दोन महिन्यांपासून वाढीव बिल येत आहे तसेच आमच्या बिल्डिंग मधील बहुतेक सर्वांनाच असे वाढीव बिल आले असल्याने आम्ही सर्वजण हैराण झालो असून महावितरण सामान्य नागरिकांना वाढीव बिल पाठवून लुबाडत आहे', अशी संतप्त प्रतिक्रिया मुलुंड पूर्व येथील आकांक्षा इमारतीत राहणारे जेष्ठ नागरिक सुरेश भोगले यांनी यानिमित्ताने दिली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम