
काटई टोलनाका बंद करा कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील
- by Reporter
- Jul 20, 2020
- 1285 views
कल्याण (श्रीराम खंडू) : कल्याण-शीळ रस्त्याचे तसेच नविन निळजे पुलाचे काम जलदगतीने होण्यासाठी काटई येथील टोलनाका बंद करण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. करावा.
कल्याण-शीळ रस्त्यावर काटई येथे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा टोल नाका आहे. या टोलनाक्यावर केवळ अवजड वाहनांना टोल आकारला जातो. सध्या कल्याण-शीळ रस्त्याचे काम सुरू असून बहुतांश ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद असून ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरसह इतर प्रवाशांना कल्याण शीळ रस्त्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. या रस्त्यावर वाढलेली वाहनांची संख्या आणि काम सुरू असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी असते असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
तर या रस्त्याचे काम सुरू असेपर्यंत हा टोल नाका बंद करून टोल वसूल करण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा काढून टाकावी अशी मागणी आपण जिल्हा नियोजन समितीमध्ये केली होती. परंतु त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे ते म्हणाले. सद्यस्थिती पाहता निळजे येथील पूल धोकादायक झाल्याने अवजड वाहनांना या रस्त्यावरून बंदीच घालण्यात आली असून टोलनाका आणि त्याच्या यंत्रणेची सध्या तरी गरज नाहीये. तसेच टोल नाका बंद झाल्यास वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होऊन, कल्याण-शीळ रस्त्याचे काम जलदगतीने होऊ शकते. त्याचप्रमाणे निळजे येथील नवीन पुलाचे काम दोन्ही बाजूने सुरू करण्यासाठी हा टोल नाका बंद करून, उभारण्यात आलेली यंत्रणा तातडीने काढून टाकण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे
रिपोर्टर