
गुरूपौर्णिमेवर कोरोनाचे सावट: शिर्डी, शेगाव, अक्कलकोट, सिंधुदुर्गसह अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये भक्तांविना गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
- by Adarsh Maharashtra
- Jul 05, 2020
- 1406 views
मुंबई : आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. परंपरेप्रमाणे या दिवशी आपल्या गुरूंची पुजा केली जाते. गुरुपौर्णिमा मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केली जाते. राज्यातील महत्वाच्या मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शिर्डी, शेगाव, अक्कलकोटला दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. यंदा मात्र ही सर्व मंदिरं सुनीसुनी आहे. भक्तांविना गुरुपौर्णिमा सर्वत्र साजरी होत आहे.
अक्कलकोट येथे स्वामी भक्तांविना गुरुपौर्णिमा
राज्यभर कोरोनाचे संकट वाढत असल्याने दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा गुरुपौर्णिमेच्या सोहळा मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा होतोय स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन ऊर्जा मिळवण्या साठी गुरुपौर्णिमेला देशभरातून लाखो भाविक वटवृक्ष मंदिरात येत असतात. मात्र कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर 17 मार्चपासून मंदिर बंदच आहे. मंदिरातील उपचार आणि परंपरा नियमितपणे साजरे होत असले तरी आज गुरुपौर्णिमेला भक्ताविना मोकळे मंदिर पहायची वेळ कोरोनाचे आणली आहे. अक्कलकोटमध्ये 59 कोरोनाचे रुग्ण असल्याने शहरातील अनेक भागात कंटेन्मेंट झोन बनवले आहेत. त्यामुळेच यंदा घरीच गुरुपौर्णिमा करण्याचे प्रशासनाचे आवाहन स्वामी भक्तांनी ऐकले आहे.
शिर्डी साई मंदिरातील गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा
आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला दरवर्षी शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. मात्र कोरोनाच्या सावटामुळे शिर्डी साई मंदिरातील गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला. साई संस्थानच्या इतिहासात प्रथमच भक्तांविना हा उत्सव साजरा झाला. 4 जुलै ते 6 जुलै असा तीन दिवस हा उत्सव साजरा होतोय. या काळात केवळ धार्मिक विधी या दरम्यान पार पडणार आहेत. रथ यात्रा तसेच पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. पायी पालख्या घेऊन येणाऱ्या भाविकांना देखील पालख्या न आणण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा बघता अगोदर नोंदणी करून रक्तदान करावे, तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावा असं आवाहन देखील साई संस्थानने केलं आहे.
शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरात शुकशुकाट
विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलडाण्याच्या शेगाव इथं गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी भाविकांची मोठी मांदियाळी जमते. गजानन महाराजांना गुरू मानत भाविक दर्शनाकरता शेगावी असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गजानन महाराज मंदिर बंद आहे. पहिल्यांदाच शेगाव इथं गुरुपौर्णिमाला गजानन महाराज मंदिर परिसरात शुकशुकाट आहे. गुरुपौर्णिमेला मंदिर परिसर गर्दीने फुललेला असतो मात्र आज रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळतोय.
सिंधुदुर्गातील कविलगावात गुरुपौर्णिमा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी
भारतातील पहिले साई मंदिर अशी ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कविलगावात आज गुरुपौर्णिमा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी केली जात आहे. कोरोनाच्या सावटामुळे कविल गावातील साई मंदिरातील गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. साईबाबांना गुरू स्वरूप मानून साई भक्त या साई मंदिरात दर्शनाला हजेरी लावत असतात मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्याने घरी राहूनच त्यांना आपल्या गुरूला वंदन करावे लागणार आहे. साईबाबांच्या भक्तांसाठी गुरुपोर्णिमा उत्सवाला मोठे महत्व आहे.
अख्यायिका अशी आहे की, कुडाळ तालुक्यातील कविलगाव येथील रामचंद्र माडये हे श्री दत्तमहाराजांचे असीम भक्त होते. त्यांच्या कठोर भक्तीचे फलस्वरुप त्यांच्या स्वप्नात प्रत्यक्ष दत्तमहाराजांनी साक्षात्कार घडवून तू शिर्डीला ये असे सांगितले. त्याप्रमाणे शिर्डी येथे गेलेले माडये यांना साई बाबांची भेट घडली. तेव्हाच त्यांना साईस्वरुपात दत्तांचे प्रत्यक्ष दर्शन घडले. शिर्डीहून परतताना बाबांनी त्यांच्या हातावर एक रुपयाचे नाणे ठेवले व तू आता जा मी तेथेच येत आहे असा संदेश दिला. त्याप्रमाणे कविलगावात आल्यानंतर काही वर्षातच म्हणजे सन 1918 साली शिर्डी येथे बाबांनी आपला पवित्र देह ठेवला. आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी म्हणजे सन 1919 साली कविलगावात बाबांच्या अद्भुत भक्ती प्रेरणेने प्रेरीत झालेल्या माडये यांनी बाबांचा पहिला पुण्यतिथी उत्सव साजरा केला. विशेष म्हणजे या उत्सवा करीता साईबाबांनी दिलेल्या एक रुपया उत्सवाच्या संपूर्ण खर्चाकरीता वापरण्यात आला.
जालना मध्ये समर्थ रामदासांच्या जन्मगावी विशेष अनुष्ठान
समर्थ रामदासांचे जन्मस्थान असलेल्या जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथे दरवर्षी गुरू पोर्णिमेनिमित्त दर्शनासाठी मोठी गर्दी असते. पण यावेळी कोरोनामुळे भाविकां साठी दर्शन पूर्णतः बंद ठेवण्यात आलंय. दरम्यान आज गुरुपौर्णिमा निमित्त सकाळी 7 वाजता आरती आणि गुरुपौर्णिमा विशेष उपासना करण्यात आली. यावेळी विशेष अनुष्ठान करून हे मंदिर बंद करण्यात आले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम