
मुलुंडची कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढली; कालच्या दिवसांत आढळले ११४ रुग्ण
- by Adarsh Maharashtra
- Jul 02, 2020
- 1523 views
मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले) मुलुंडमध्ये काल १ जुलै रोजी रात्री ८ वाजेपर्यंत एका दिवसांत ११४ कोरोना रुग्ण आढळून आल्याने मुलुंडची कोरोना रुग्ण संख्या २५९० वर पोहचली आहे. यापैकी १४१९ रुग्णांवर सध्या उपचार चालू असून १०४८ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत तर १२३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. एकूण रुग्ण संख्येच्या ४० टक्के रुग्ण बरे झाले असून सध्या ५५ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. मृत्यू झालेले रुग्ण हे एकूण रुग्णसंख्येच्या ४.७ टक्के आहेत.
लॉक डाऊन सुरू झाल्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरू होईपर्यंत म्हणजेच २४ मार्चपासून ते ४ जून पर्यंतच्या ७२ दिवसांत एकूण ९३६ कोरोना पॉज़िटिव रुग्ण मुलुंडमध्ये आढळून आले होते. सरासरी १३ रुग्ण प्रत्येक दिवशी असे हे प्रमाण होते परंतु राज्य शासनाने अनलॉक प्रक्रियेला ५ जूनपासून सुरूवात केल्यानंतर १ जुलै पर्यंतच्या गेल्या २६ दिवसांत १६५४ रुग्ण मुलुंडमध्ये कोरोना पॉज़िटिव आढळून आले असून प्रत्येक दिवशी सरासरी ६३ रुग्ण असे हे प्रमाण झाले आहे. याचा अर्थ लॉकडाऊनमध्ये करण्यात आलेल्या शिथिलतेचा फायदा मुलुंडमधील काही उडानटप्पू नागरिकांनी घेवून विनाकारण घराबाहेर पडायला सुरुवात केली त्यामुळे मुलुंडमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहेच त्याशिवाय नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त संपूर्ण मुंबईत जाणारे मुलूंडकर देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या येथे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १९ मे पासून १ जुलै पर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ८० टक्के रुग्ण हे को ऑप हौसिंग सोसायटी, उच्चभ्रू वसाहती येथे राहणारे असून स्लममध्ये, बैठ्या चाळीत राहणारे रुग्ण सध्या कमी प्रमाणात आढळत आहेत. झोपडपट्टी विभागात शारीरिक अंतरच्या नियमांचे पालन करणे कठीण असतेच त्याशिवाय सार्वजनिक शौचालयाचा वापर येथे करावा लागत असल्याने सुरुवातीच्या काळात येथून कोरोनाबाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत होती परंतु कालांतराने येथील रहिवाशांनी अधिक सावधानता बाळगल्याने तसेच सार्वजनिक शौचालयाची वारंवार साफसफाई व सॅनिटायझर फवारणी होत असल्यामुळे येथील रुग्ण संख्या कमी झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली असून अनलॉक प्रक्रियेमुळे मुलुंडच्या नागरिकांचे ऑफीस, दुकान व व्यवसायानिमित्त मुंबईला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे परंतु या सर्व नागरिकांनी प्रवासात व कामाच्या ठिकाणी नियमित मास्क वापरणे जरूरीचे असून इतरांसोबत बोलताना ६ फूट अंतर ठेवणे आवश्यक आहे. वारंवार सॅनिटायझरने हात स्वच्छ करुन आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तसेच गाडीने जाताना गाडीत ३ पेक्षा अधिक जणांनी एकत्र प्रवास करु नये, अश्या प्रकारची बंधने पाळली व आवश्यक ती काळजी सर्वांनी घेतली तर मुलुंडमधील कोरोनाबाधित रुग्ण संख्या आटोक्यात राहिल, असे आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम