विक्रोळीतील जनतेसाठी सतत कार्यरत असणारे, 'मूर्ती छोटी पण कार्ये महान' व्यक्तिमत्व जयंत दांडेकर

मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्ये करताना आढळून येत आहेत परंतु विक्रोळीतील कन्नमवार नगर मधील एक अवलिया मात्र गेल्या साडे तीन महिन्या पासून सकाळी ७ वाजल्यापासून रात्री काम संपेपर्यंत तहान भूक विसरून कोरोना योद्धाचे काम करताना दिसून येत आहे. या अवलियाची शारीरिक उंची जरी कमी असली तरी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची उंची मात्र प्रचंड आहे आणि म्हणूनच कन्नमवार नगर मधील घराघरांत त्यांच्या सामाजिक कार्याची चर्चा आज ऐकायला मिळत आहे. विक्रोळीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा क्रमांक ११८ चे शाखाध्यक्ष जयंत दांडेकर हे या अवलियाचे नाव असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी देखील त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे. 


कोरोनाचे कोणतेही भय न बाळगता विक्रोळी कन्नमवार नगर परिसरात राहणारे, सतत जनतेच्या संपर्कात असणारे, रहिवाशांच्या अडी-अडचणीत धावून जाणारे  जयंत दांडेकर हे देखील असेच एक कोरोना योद्धा आहेत ज्यांचा विक्रोळीतील अनेक सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग आहे. कोरोना काळात विक्रोळीतील नागरिकांसाठी सतत राबणारे ५७ वर्षीय जयंत दांडेकर यांची ऊंची अवघी ‘साडेतीन’ फुट इतकी असली तरी एकाद्या तरुणाला मागे टाकतील या त्वेषाने सकाळी सात वाजल्यापासून समाजकार्याला सुरुवात करतात ते रात्रीपर्यंत सुरूच असते. दूपारी जेवणासाठी घरी येतात तेव्हादेखील मध्येच मदतीसाठी एकाद्या अडलेल्या नागरिकाचा फोन येतो, परंतु तरीही न थांबता त्या व्यक्तीच्या मदतीसाठी पुन्हा धावपळ करतात. आपल्या विभागातील कोणताही नागरिक कोणत्याही मदतीपासून वंचित राहू नये, हेच ध्येय ठेवून सतत कार्यरत असणारे जयंत दांडेकर हे आगळेच व्यक्तिमत्व आहे.  

जेव्हा आम्ही त्यांच्या कार्याची माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता ते म्हणाले, प्रसिद्धी देऊ नका, मी काही वेगळे करत नाही आहे. मी जनतेची सेवा करत आहे. कोरोना सारख्या महामारीपासून विक्रोळी परिसरातील माझ्या जनतेला वाचविण्यासाठी मी काम करत आहे. त्यावेळी तुम्ही करत असलेल्या सामाजिक कार्याची चर्चा ऐकू आल्याने तुमच्याकडूनच त्याची माहिती घ्यावी या उद्देशाने आम्ही येथे आलो आहोत. तुमच्या कामाची दखल घेणे आवश्यक असून तुमच्यापासून प्रेरणा घेऊन तरुण पिढी समाजकार्यात येईल, असे सांगितल्यावर ते कामाबद्दल बोलायला तयार झाले. 

'लॉकडाउन जाहीर झाले, तेव्हापासून नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. दररोज शेकडो नागरिकांचे फोन येतात. कोणाला डॉक्टरकडे जायचे असते. कोणाला रुग्णालयात प्रवेश मिळत नसतो, कोणाला शिधा हवा असतो. कोणाचे अन्य प्रश्न असतात. त्यामुळे गेल्या साडे तीन महिन्यांपासून सतत लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी धावत आहे. माझ्या विक्रोळीत कोरोनाचे रुग्ण वाढताहेत याची भीती वाटते. प्रत्येकाने सोशल डिस्टन्स पाळणे आणि मास्क घालणे गरजेचे आहे, सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे. मी देखील फिरताना सुरक्षा कवच, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर यांचा नेहमीच वापर करतो.

लॉकडाऊन मध्ये माझ्या विभागातील रुग्णालये, अनेक खाजगी दवाखाने बंद होते परंतु संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधून करून ते सुरू केले. रेशनसाठी ज्यांचा आर. सी. नंबर नव्हता आणि या लॉकडाऊन मुळे ते शक्य नव्हते अशा वेळेस अधिकारी वर्ग आणि दुकानदार यांच्याशी योग्य समन्वय साधून अनेक कुटूंबाना, रेशन कार्डधारकांना त्यांच्या हक्काचा शिधा मिळवून दिला. गरीब, गरजू, निराधार, अपंग, रिक्षा चालक अशा जवळ जवळ ६५० कुटुंबाना तांदूळ, गहू, डाळ, तेल, मीठ इत्यादी जिन्नस देऊन मदत केली. दररोज स्थानिक पोलिसांना चहा, पाणी यांची व्यवस्था केली. त्याशिवाय मास्क, चेहरा सुरक्षा कवच, सॅनिटायझर, इत्यादींचे मोफत वाटप केले. अनेक सोसायटीत आणि परिसरात सॅनिटायझेशन करून घेतले. परप्रांतीयांना त्यांच्या प्रदेशात जाण्यासाठी योग्य ते सर्व सहकार्य केले. काही रुग्णांना इस्पितळात दाखल करून घेतले जात नव्हते, त्यांना योग्य ती मदत करून रुग्णालयाच्या प्रशासनाशी बोलून दाखल करून घेतले. प्रभागात सायन रुग्णालयाच्या सौजन्याने मोफत कोरोना तपासणी अभियान घेतले, आदी केलेल्या सामाजिक कामांचा पाढाच दांडेकर यांनी वाचला.

               स्वत: चालविली रिक्षा

एका रूग्णाला सर्दी, ताप, खोकला याचा त्रास होत होता. दांडेकर यांनी वेळ न दवडता त्याला उपचार मिळावेत याला प्राधान्य दिले आणि स्वत: रिक्षा चालवून त्या रूग्णाला दवाखान्यापर्यंत नेले. याबाबतचे छायाचित्रही सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहे. माझे काम एकच वेळेवर मदत मिळायला हवी, त्यासाठी जिवाची पर्वा करायची नाही, असे दांडेकर सांगतात.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय टागोर नगर येथे नॉन कोविड अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यासाठी सहकाऱ्यांच्या साथीने सतत पाठपुरावा करुन यश मिळविले. मोफत आरोग्य शिबिरे भरविण्यात आली, विभागातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधाचे मोफत वाटप केले, इत्यादी अनेक सामाजिक कार्ये या लॉकडाऊनच्या काळात एकही दिवस खंड न पडता केली आहेत व कोरोना जाईपर्यंत माझ्या जनतेसाठी ही सामाजिक कार्ये सुरूच ठेवणार असल्याचे जयंत दांडेकर यांनी सांगितले. नुकतेच अनेक रहिवाशांना अदानी वीज कंपनीने भरमसाठ बिल पाठवले आहे त्याविरुद्ध लढा आता देणार आहे, असे या अवलियाने सांगितले. 

लोकांसाठी सतत धावणारा हा अवलिया म्हणूनच विक्रोळी परिसरात लोकांच्या मनात, घरात मानाचे स्थान मिळवून आहे. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट