गेल्या दोन दिवसांत मुलुंडमध्ये आढळले १४४ कोरोनाबाधित रुग्ण.

मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले) मुलुंड मधील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून गेल्या दोन दिवसांत १४४ कोरोनाबाधित रुग्ण मुलुंडमध्ये आढळून आले आहे. सोमवार दि ८ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर  मुलुंडमधील सर्व दुकाने सुरू करण्यात आल्याने मुलुंडकरांची खरेदीसाठी झुण्बड उडाली. मुलुंड पूर्व आणि पश्चिमचे रस्ते माणसांच्या गर्दीने फुलून गेले होते. परिणामी बुधवार दि १० जून रोजी ७१ कोरोनाबाधित रुग्ण तर गुरुवार दि ११ जून रोजी ७३ कोरोनाबाधित रुग्ण मुलुंडमध्ये आढळून आले आहेत. आजपर्यंत मुलुंडची कोरोनाबाधित रुग्णसंख्या १२३८  पर्यंत पोहचली असून यात ७३९ रुग्णांवर उपचार चालू असून ४४३ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत तर ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्य सरकारने 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत दि ३ जूनपासून अनलॉकचा पहिला टप्पा, दि ५ जून पासून दुसरा टप्पा तर सोमवार दि ८ जून पासून तिसरा टप्पा अश्या तीन टप्प्यात अनलॉकला सुरुवात केली. तिसऱ्या टप्प्याअंतर्गत मुलुंडमधील रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकाने एक दिवस खुलतील तर डाव्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी खुलतील आणि रविवारी सर्व दुकाने बंद राहतील अश्या पध्दतीचे धोरण आखण्यात आले. परंतु सोमवार पासून दुकाने सुरू झाली आणि मुलुंडकरांची खरेदीसाठी रस्त्यावर गर्दी दिसायला लागली. पूर्वीप्रमाणे दिवस सुरू झाले या आविर्भावात कोरोनाला विसरून चारचाकी, दुचाकी घेवून नागरिक रस्त्यावर फिरु लागले. काही नागरिकांनी पायी चालत दुकाने गाठली. त्यातच ज्या दिवशी उजव्या बाजूच्या दुकानांना उघडायची परवानगी आहे, त्या दिवशी डाव्या बाजूची दुकाने देखील दुकानाचे अर्धे शटर बंद करुन धंदा करताना दिसत होते तीच अवस्था दुसऱ्या दिवशी दिसायची. काही भाजी विक्रेते परवानगी नसतानाही रस्त्यावर भाजी विकताना दिसत होते. पोलिस व पालिका यांचे अस्तित्व सोमवारपासून कुठेच जाणवत नव्हते. 

'प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळेच गेल्या दोन दिवसांपासून मुलुंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलेला दिसत असून एकूण १४४ कोरोनाबाधित रुग्ण या दोन दिवसांत आढळून आले आहेत.  मुलुंडकर जर असे बेधडक स्वतःची काळजी न घेता दुकानात, रस्त्यावर गर्दी करत राहिले तर पुढील काळातही रुग्णांची संख्या अधिक वाढू शकते, असे मुलुंड मधील जेष्ठ नागरिक प्रभाकर सुर्वे यांनी सांगितले. 

मुलुंडचे टी वार्ड पालिका प्रशासनाची उदासिनताच रुग्ण वाढीला कारणीभूत असल्याचे मत अनेक मुलुंडकर नागरिक व्यक्त करताना दिसत असून अर्धे शटर उघडे ठेवून नियमबाह्य धंदा करणारे दुकानदार, रस्त्यावर, पदपथावर भाजी विकणारे भाजीविक्रेते व इतर किरकोळ विक्रेते यांच्यावर जोपर्यंत पालिका प्रशासन कडक कारवाई करत नाही तोपर्यंत नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर येणे बंद होणार नाही. पोलिसांनी देखील विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या बाबतीत कडक भूमिका घेणे आवश्यक आहे तसेच नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करत स्वतःची व कुटुंबाची काळजी घेतली तर मुलुंडमधील कोरोना रुग्ण संख्या कमी होईल व साहजिकच त्यामुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही असे मुलुंडमधील सुजाण नागरिक सांगताना दिसत आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट