३१ मे नंतरही लॉकडाऊन उठवणार नसल्याचे संकेत

मुंबई, २८ मे:-लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत असताना त्यानंतर लॉकडाऊन पूर्णपण उठवला जाणार नाही, असे स्पष्ट संकेत मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तां कडून राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. राज्यातील अर्थचक्र सुरु करण्यासाठी ३१ मेनंतर लॉकडाऊनध्ये आणखी शिथिलता दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केलंय. ग्रीन झोनमध्ये बऱ्यापैकी व्यवहार सुरु करण्याचा राज्याचा विचार आहे. मात्र, यासाठी काही निमय व अटी निश्चित घालण्यात येणार आहेत. नियम व अटींचे उल्लंघन केल्यास हे व्यवहार बंद केले जातील याची कल्पना नागरिकांना देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात.

आज ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, स्थलांतरित आणि लॉकडाऊन शिथिल केल्याने प्रवास करीत असलेल्या नागरिकांमुळे ज्या जिल्ह्यांत रुग्ण नव्हते तिथेही प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एकीकडे राज्याचे अर्थचक्र सुरु करीत असलो तरी त्यामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते हे लक्षात घेऊन विषाणूचा पाठलाग जास्त गांभीर्याने करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. याप्रसंगी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील सर्व नागरिकांना कॅशलेस उपचार देणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य या देशातील महत्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यांत काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले.मुख्य सचिव अजोय मेहता यांनी देखील महत्वपूर्ण सूचना दिल्या.

दरम्यान, राज्यात काल १०५ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. तर दिवसभरात तब्बल २ हजार १९० नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आता ५६ हजार ९४८ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ९६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल १००२ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३२ हजार ९७४ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील कोरोनाबळींची संख्या १०६५ वर पोहोचली आहे.

मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. पुण्यात काल दिवसभरात तब्बल ११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे येथे आतापर्यंत २८४ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात १०६ नवीन रुग्णांची भर पडल्याने पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५५३३ वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात काल सर्वाधिक १०५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या १८९७ इतकी झाली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट