परदेशातील २५९४ नागरिक महाराष्ट्रात परत आलेल्या प्रवाशांच्या क्वारंटाईनची काटेकोर अंमलबजावणी
- by Adarsh Maharashtra
- May 26, 2020
- 522 views
मुंबई दि.२६::- वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत २५९४ नागरिक आले असून या सर्वांच्या क्वारंटाईनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.
संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना निर्मुलनासाठी निग्रहाने लढत असतांना माणुसकीच्या नात्याने परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे.
वंदे भारत अभियानांतर्गत २० फ्लाईटसच्या माध्यमातून हे नागरिक महाराष्ट्रात आले असून त्यात ९५५ प्रवासी मुंबईचे आहेत. ११९८ प्रवासी उर्वरित महाराष्ट्रातील आहेत तर ४४१ प्रवासी इतर राज्यांमधील आहेत. आलेले नागरिक हे ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका आणि इंडोनेशिया मधून आले आहेत. अजून १० फ्लाईटसने परदेशात अडकलेले नागरिक महाराष्ट्रात येणे अपेक्षित आहे.
आलेल्या नागरिकांचे संस्थात्मक क्वारंटाईन
बृहन्मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांना त्यांचे जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत क्वारंटाईन केले जात आहे.
महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी दिनांक २४ मे २०२० रोजी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.
इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. त्यांचा वाहतूक पास संबंधित राज्यातून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे.हे वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीपणे राबवित आहे.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम