पाकिस्तानात प्रवासी विमान कोसळलं, कराचीजवळ घडली घटना

कराची :पाकिस्तानातील कराची शहराजवळ प्रवासी विमान कोसळण्याची घटना घडली आहे. हे विमान लाहोरहून कराचीला जात होते.अपघातग्रस्त विमानात 91 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स असे एकूण 99 जण होते.

PK8303 नावाचं हे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स (PIA) चं विमान होतं. दुपारी एक वाजता लाहोरहून हे विमान कराचीच्या दिशेनं झेपावलं. मात्र, कराची विमानतळावर उतरण्याआधीच ते रहिवाशी भागात कोसळलं.कराची विमानतळापासून अगदी जवळच असणाऱ्या जिना गार्डन भागात कोसळलं. मॉडेल कॉलनीजवळ हे दुर्घटनास्थळ आहे. विमान कोसळल्यानं या भागातील काही घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या अपघातानंतर दुःख व्यक्त केले आहे. बचावकार्य सुरु असल्याचे सांगून या अपघाताची तात्काळ चौकशी करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले आहेत.

काही प्रत्यक्षदर्शींनी या दुर्घटनेचे व्हीडिओ शूट केले. त्यानुसार, घटनास्थळावरील गाड्यांनाही आग लागलेली दिसून येतेय. तसंच, या अपघातानंतर घटनास्थळावर धुराचे लोट दिसले.कराची पाकिस्तानचं व्यापारकेंद्र मानलं जातं. येथील जिना इंटरनॅशल एअरपोर्ट पाकिस्तानातील सर्वात व्यग्र विमानतळ मानलं जातं.

कोरोना व्हायरसमुळं लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन उठवल्यानंतर पाकिस्तानात हवाई वाहतूक सुरू करण्यात आली होती.पाकिस्तानी सैन्याकडून बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेण्यात आलीय.पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी आर्मीचे हेलिकॉप्टर बचावकार्यासाठी घटनास्थळी गेले आहेत. अर्बन सर्च अँड रेस्क्यू टीमही घटनास्थळाकडे पाठवण्यात आल्यात.

पाकिस्तानातील तिसरी मोठी दुर्घटना

हवाई दुर्घटनेची आकडेवारी गोळा करणारी संस्था एअरक्राफ्ट क्रॅश रेकॉर्ड ऑफिसच्या माहितीनुसार, पाकिस्तानात आतापर्यंत 80 हून अधिक विमान दुर्घटना घडल्यात. या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत तीन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय.

पाकिस्तानात सर्वात मोठा विमान अपघात इस्लामाबादजवळ 28 जुलै 2010 रोजी झाला होता. या अपघातात 152 जणांचा मृत्यू झाला होता.

20 एप्रिल 2012 रोजीही इस्लामाबाद मध्येच अपघात झाला होता. त्यात 127 जणांचा मृत्यू झाला होता.या दोन घटनांनंतर सर्वात मोठा अपघात आज कराचीत झालेला अपघात मानला जातोय.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट